राज्यात भाजपाच्या पाठिंब्याने शिवसेनेत फुट पाडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. त्यानंतर सत्ताधारी विरूध्द विरोधक अर्थात महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात पहायला मिळत आहे. तसेच हा संघर्ष तीव्र होताना शिवसेना विरुद्ध शिंदे गट, शिवसेना विरुद्ध भाजपा, काँग्रेस विरुद्ध भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असे अनेक राजकिय सामने राज्यात पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत चांगलीच टोलेबाजी केल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सध्या ठाणे-कल्याणच्या दौऱ्यावर असून त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले
शनिवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देशाचे सरन्यायाधीश यु. यु. लळीत यांचा सत्कार करण्यात आला. यावर विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सरन्यायाधीशांनी या प्रकरणातील एका पक्षासोबत कार्यक्रमात हजेरी लावणं चुकीचं असल्याची टीका केली जात आहे.
यावरून विरोधक टीका करत असल्याबाबत विचारणा होताच श्रीकांत शिंदे यांना विचारताच ते म्हणाले की, राज्यात हे बहुमताचं सरकार आलं आहे. त्यामुळे विरोधकांना आता करायला इतर कुठल्या गोष्टी उरल्याच नाहीयेत. आता एकनाथ शिंदे ज्या गोष्टी करतील त्याच्यावर टीका करणं हेच काम त्यांना राहिलंय असे सांगत ते पुढे म्हणाले की, विरोधकांना आता पूर्णवेळ एकनाथ शिंदेच दिसतात. स्वप्नातही त्यांच्या एकनाथ शिंदेच येतात. गणेशोत्सवात एकनाथ शिंदे फिरले. त्यासोबत शासकीय कामकाज, सरकारी निर्णय घेण्याचंही काम त्यांनी केलं. इतक्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसं करू शकतो? हे विरोधकांच्या डोळ्यांत खुपायला सुरुवात झाली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. ये तो केवल झाँकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है, असा गर्भित इशाराही विरोधकांना दिला.