जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या परधाडे रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दूर्घटनेची माहिती घेतली. दूर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही घटना अतिशय वेदनादायी आहे. जळगांव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याबाबतही आश्वस्त केले.
जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल.
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.#jalgaon pic.twitter.com/NHTUr1JTqw— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025