Breaking News

मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; गोविंदासाठी नोकरीत आरक्षण, स्पर्धेतील बक्षिसे सरकार देणार दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत केली घोषणा

दरवर्षी दहीहंडी उत्सव मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र या सणा निमित्त सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकातील अनेक जण जखमी होतात किंवा मृत्युमुखी तरी पडतात. मात्र दहीहंडी हा खेळ साहसी खेळात समाविष्ट करण्यात येणार असून खेळताना गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना १० लाखाची मदत तर हात किंवा पाय मोडल्यास ५ लाख रूपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत करत गोविंदा पथकातील सदस्यांना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षणही देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

याशिवाय प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-गोविंदाच्या स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेतील बक्षिसांची रक्कम पूर्णपणे राज्य सरकारकडून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियम ४६ अन्वये खाली याप्रश्नी निवेदन केले. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेनेचे सुनिल प्रभू यांनी त्यावर प्रश्न उपस्थित करत उपचार करण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्यासही मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता देत जखमी गोविंदावर राज्य सरकारच्या पैशातून उपचार कऱण्यात येणार असल्याचे सांगितले.

दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.

मृत व जखमी गोविंदांसाठी सहाय्य

यानुसार गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास १० लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला ७ लाख ५० हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला ५ लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.

हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष २०२२) लागू राहील.  दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

अटी व शर्ती

हे आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी पुढील अटी व शर्ती लागू आहेत- दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे, गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी,  त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे, मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून १८ वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे, मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *