Marathi e-Batmya

छगन भुजबळ म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरण आगामी कुंभमेळ्याच्या पूर्वी पूर्ण करा

नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या किकवी धरण हे अतिशय महत्वाचे असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे धरण अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे संपूर्ण ११५ टीएमसी पाणी पूर्णपणे गोदावरी खोऱ्यात वळवावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

सिंचन भवन, नाशिक येथे आज उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार डॉ.राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, आमदार अमोल खताळ, आमदार आशुतोष काळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार देवयानी फरांदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, नांदूर मधमेश्वर प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशात असा कायदा आहे की, ज्या राज्याच्या जमिनीवर पाऊसाचे जे पाणी पडेल त्याचा सर्वस्वी अधिकारी हा त्या राज्याचा आहे. गुजरातच्या सिमेनजीक महाराष्ट्राच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मात्र हे सर्व पाणी समुद्राला वाहून जात असल्याने या पाण्याचा आपल्याला कुठलाही उपयोग अद्याप करता आला नाही. याबाबत आपण पथदर्शी मांजरपाडा हा प्रकल्प साकारला असून येवल्याच्या शेवटच्या टोकाला आपण पाणी पोहोचवू शकलो आहे. मात्र अद्याप हे पाणी तेवढे पुरेसे नाही. आपल्याला अधिक पाण्याची आवश्यकता आहे. आपण ते पाणी उपलब्ध करून द्याल याची खात्री आहे. गोदावरी खोऱ्याच्या माध्यमातून नाशिकसह मराठवाड्याला पाणी पोचविण्यात येऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करावा असे सांगितले.

छगन भुजबळ म्हणाले की, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ११५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. यातील ९० टीएमसी पाणी उपलब्ध करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येणार आहे. केवळ १ लाख कोटी नाही तर अधिक कर्ज काढून संपूर्ण ११५ टीएमसी पाणी वळविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोकणातून प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. हेच पाणी उपयोगात आणून, पूर्व भागात विशेषतः गोदावरी खोऱ्यात जलसिंचनासाठी वापरण्याची कल्पना ही खरोखर दूरदृष्टीपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आजही ९१ टीएमसी हून अधिक पाणी उकई धरणात वाहून जात आहे. हे पाणी वळविण्यासाठी देखील आपण प्रयत्न करावे असेही सांगितले.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारकडून या विचारधारेला चालना देऊन ‘कोकणातील पर्जन्यमानाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे’ हा धाडसी निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे केवळ सिंचनासाठीच नव्हे, तर नाशिकसह मराठवाडा जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागतील, जलसाठ्यांवरील दाब कमी होईल व तंत्रशुद्ध शेतीला चालना मिळेल. कृषी प्रक्रिया उद्योग, बियाणे प्रक्रिया, फळबागा, निर्यातक्षम उत्पादने यांना पूरक असणारे हे जलसमृद्धीचे स्वप्न आता वास्तवात उतरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी धाडसी निर्णय घेत आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असेही म्हणाले.

यावेळी जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्पाच्या डीपीआर तयार करण्यासाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा डीपीआर जानेवारी २०२६ पर्यंत शासनाला प्राप्त होईल त्यानंतर लगेच यावर कार्यवाही सुरू होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्पासाठी राबविण्यात येत आहे. त्यासाठी हा प्रकल्प आग्रहाने राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे-पाटील पुढे म्हणाले की, दमणगंगा एकदरे, दमणगंगा वैतरणा देवनदी गोदावरी लिंक, उल्हास वैतरणा गोदावरी, पार गोदावरी प्रकल्प शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असून नाशिक नगरसह मराठवाड्याला यामाध्यमातून मूलबक पाणी उपलब्ध होणार आहे. राज्यातील हे नदीजोड प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ९० टक्के निधी उपलब्ध करून देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपली मागणी आहे. राज्यातील जी धरणे आहेत यामध्ये गाळयुक्त वाळू मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ही धरणे गाळमुक्त करण्यासाठी शासन काम करत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वेळेत योजनांची कामे पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगितले.

यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी केले.

Exit mobile version