Breaking News

सहकार मंत्रालयाची स्थापना कशासाठी? विचारणाऱ्यांना उत्तर द्यायला आलोय केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचा अप्रत्यक्ष राष्ट्रवादीला टोला

मराठी ई-बातम्या टीम

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी मोदी सरकारने पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन केलं. अनेकांनी विचारलं या मंत्रालयाची कालसुसंगतता काय? असा सवाल विचारणाऱ्यांना   उत्तर द्यायला मी आलोय. देशातील सहकारी साखर कारखान्यांमधून एकूण ३१ टक्के साखरेचं उत्पन्न होतं. हे देशात सर्वांना माहिती नाही. दुधाचं २० टक्के उत्पादन सहकार क्षेत्र करते. १३ टक्के गहू, २० टक्के तांदुळाची खरेदी सहकार क्षेत्र करतं. २५ टक्के खतांचं उत्पादन आणि वितरण दोन्ही सहकाराच्या माध्यमातून होतं असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगत अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे भरलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेत सहकार क्षेत्राविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यावेळी उपस्थित होते.

अनेक सहकारी साखर कारखाने नंतर खासगी होतात असं म्हणत त्यांनी सहकारी साखर कारखाने विकत घेऊन खासगी करणाऱ्या नेत्यांवरही निशाणा साधला.

विठ्ठलराव विखे पाटलांनी दूरदृष्टीतून शेतकऱ्यांच्या विकासासाठी साखर कारखाना सुरू केला. हा साखर कारखाना आजही सहकारी पद्धतीने सुरू आहे याचा मला आनंद वाटतो. कारण अनेक सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. कमीत कमी एक साखर कारखाना जपून ठेवला आहे आणि तो व्यवस्थितपणे चालवत आहेत याचा मला खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राने सहकारी चळवळीत जे योगदान दिलंय त्याची आठवण करावी लागेल. १९२३ मध्ये लोणीत सहकारी पतपेढी तयार करण्यात आली. त्यानंतर सहकारी मिल तयार झाली. हे प्रवरानगर सहकाराशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी सहकाराची काशी आहे. प्रवरा साखर कारखान्याने अनेक कामं केली. चांगलं प्रशासन असेल तर वर्षानुवर्षे सहकारी संस्था कशा व्यवस्थित चालतात याचं हे उदाहरण असल्याचेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, देशात नरेंद्र मोदींचे आणि महाराष्ट्रात आमचं सरकार आलं, तेव्हा लोक म्हणायचे की यांना सहकारमधलं काय कळतं? आता सहकारचं काय होणार? पण आमच्या सरकराने सहकारबाबत घेतलेले निर्णय सहकारला अडचणीतून बाहेर काढणारे ठरले.

अनेक लोक सहकारी चळवळ धोक्यात आहे असं सांगतात. पण असे लोकच खासगी कारखाने काढून बसले आहेत आणि ते खासगी कारखान्यांचे मालक आहेत. सहकाराचे कारखाने खासगीत त्यांनी नेले आहेत आणि आता तेच शिकवतायत की सहकार चळवळ देखील अडचणीत आहेत असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

माझा त्यांना सल्ला आहे की जर सहकार चळवळ अडचणीत आहे, तर तुम्ही त्या चळवळीला मदत करा अशी खोचक टीका करत ते म्हणाले की, कारखान्यांना मदत करण्याऐवजी ते कारखाने खासगीमध्ये कवडीमोलाच्या भावाने विकत घ्यायचे आणि त्याच कारखान्याच्या जमिनी कोट्यवधींना विकायच्या किंवा गहाण टाकायच्या आणि त्यातून पुन्हा कारखाने उभे करायचे हे शेतकऱ्यांच्या कारखान्यांना खासगी लोकांच्या घशात टाकण्याचं षडयंत्र चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सहकार जगला पाहिजे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *