विधानसभा अध्यक्ष पदाच्या अनुषंगाने विधिमंडळ समितीने आपला अहवाल सादर करत काही दुरूस्त्या सुचविल्या. या दुरूस्त्या विधानसभेने स्विकारत विधानसभा अध्यक्षाची खुल्या पध्दतीने निवड करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात भाजपाचे आमदार गिरीष महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत विधिमंडळाच्या निर्णयाला आव्हान दिले. मात्र आज झालेल्या सुणावनी वेळी महाजन यांची याचिका निकाली काढत १२ लाख रूपयेही जप्त केले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत आता तरी राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीस आणि १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत आता तरी निर्णय द्यावा अशी विनंती केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रसार माध्यमाशी बोलत होते.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणून ही निवडणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करत असलेल्या भारतीय जनता पक्ष व माजी मंत्री गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून आज मोठी चपराक दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आतातरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व १२ आमदारांच्या विषयावर लवकर निर्णय घ्यावी अशी आमची विनंती असल्याचे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचे काम करत आहे. कुठलातरी कायदा पुढे करुन न्यायालयात याचिका दाखल करायची परंतु त्यांच्या या प्रवृत्तीला मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत १२ लाख रुपयेही जप्त करुन मोठी चपराक दिली. भाजपाने आतातरी लोकशाहीची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. जाणीवपूर्वक कोर्टात जायचे आणि चांगले काम सुरू आहे त्याला कोर्टात आव्हान द्यायचे काम भाजपाने बंद करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्प ११ तारखेला सादर केला जाणार आहे. त्याआधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी अशी आमची इच्छा आहे. अशोक चव्हाण, अनिल परब, अजित पवार यांनी राज्यपाल महोदय यांची काल भेटही घेतली आहे. अर्थसंकल्पाच्या आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी आणि राज्यपाल त्यादृष्टीने निर्णय घेतील असा आमचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.