संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत एकदम ७८ लाख मतदार वाढल्याचे सांगत हे मतदार कोठून आले याचे गौडबंगाल असल्याचा दावा केला. त्यावरून भाजपाचे मंत्री तथा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार करत म्हणाले की, राहुल गांधी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करीत असल्याची टीका केली.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, विरोधी पक्षाला, राहुल गांधी आणि काँग्रेसला महाराष्ट्रातील मतदारांनी जो जोरदार फटका दिला त्यातून आजतागायत शुध्दीत आलेले नाहीत. मतदार वाढले तर चूक काय? मतदार वाढले त्यामुळे यांच्या पोटात का दुखतंय ? असा सवालही यावेळी केला.
आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेच्या वेळी प्रत्येक मतदान केंद्रावर नावे गायब झाली म्हणून मतदार ओरड करताना दिसत होते. राहुल गांधी तुम्ही मतदारांची नावे गाळून लोकसभेत विजय मिळवला होतात का? राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशी टीकाही यावेळी केली.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर राहुल गांधी यांनी घेतलेल्या आक्षेपावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, या देशातील यंत्रणा, व्यवस्थांबद्दल अनास्था निर्माण करणे हा शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे. त्याचे तुम्ही प्रवक्ते का बनताय?राहुल गांधी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करीत आहात असे सांगत जे मतदार विधानसभेला वाढले त्यांचीच नावे गायब करून तुम्ही लोकसभेच्या निवडणूकीत जिंकला होतात का ? हाच राहुल गांधी यांना आमचा सवाल असल्याचेही यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा जीव हा मुंबई महापालिकेत ब्लॅक लिस्ट झालेल्या कंत्राटदारांमध्ये आणि कटकमिशन मध्ये अडकलाय अशी टीकाही यावेळी केली.
रामदास कदम यांच्या विरोधावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, रामदासभाई खरे बोलले असे सांगत जर..विरोधी पक्षनेते पद द्यायचेच झाले तर वडेट्टीवार यांनी सांगावे तुमच्यात एकमत आहे का? असा सवालही यावेळी केला.