तरूण आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल भेट घेतल्यानंतर पवारांनी भाजपाला मी काही सत्तेत येवू देणार नाही. तुम्ही काळजी करू नका असे सांगत आश्वासित केले. शरद पवारांच्या त्याच वक्तव्याचा धागा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पकडत म्हणाले की, वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपाची चिंता करू नये असा उपरोधिक टोला लगावत पुढे म्हणाले की, पण तुम्ही विश्वासघाताने सत्तेवर आलात असा आरोपही केला.
महाराष्ट्रात २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १२२ आमदार या महाराष्ट्राने भाजपाच्या चिन्हावर निवडून दिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून लोकांच्या समोर गेलो. फडणवीसांना पुन्हा महाराष्ट्रातील लोकांनी मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी भाजपाचे १०६ भाजपाचे आमदार आणि जवळपास ५५ शिवसेनेचे आमदार असे एकूण १६१ आमदार निवडून दिल्याचे आपण बघितले. परंतु तुम्ही विश्वासघात केला. सत्तेमध्ये आलात. राज्यातील जनता आजही फडणवीस यांचे नेतृत्व मानते आणि भाजपासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
जनता भाजपासोबत असल्यामुळे तुम्ही किती जरी संघर्ष केला, आम्ही काहीतरी मोठे आहोत असं वातावरण तयार केले तरी २०१९ ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही असा खोचक टोलाही त्यांनी पवारांना लगावला.
त्यांची (राष्ट्रवादीची) ५४ ची संख्या कायम ठेवण्यासाठी त्यांना वारंवार त्यांच्याच आमदारांना विश्वास द्यावा लागतोय. तुम्ही घाबरु नका, काळजी करु नका असे सांगावं लागतेय. पण तुमच्या हातातच काही नाही. कारण त्यांना त्यांची ५४ ची संख्या कमी होऊ नये याची काळजी असल्याने वारंवार सांगावे लागतेय की भाजपाला मी येऊ देणार नाही अशी टीकाही त्यांनी केली.
तुम्ही सगळ्यांना पाहिले की पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. हे सगळे येऊन सारखे सांगत होते की आता उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये सत्ता येणार नाही. वारंवार हे सांगण्यात आले. पण तिथल्या लोकांनी नरेंद्र मोदींच्या विकासाच्या अजेंड्यानुसार सर्वसामान्यांना केंद्रस्थानी मानून केलेलं काम लोकांना आवडल्यानेच लोकांनी पुन्हा सत्ता दिल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाची काळजी करायचे कारण राष्ट्रवादीला नाही. त्यांचे आमदार कसे शाबूत राहतील, त्यामध्ये काही गळती होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी असा उपरोधिक टोला लगावत पुढे म्हणाले. तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून तुमचा मुख्यमंत्री का बसवता आला नाही. काय अडचण आहे तुम्हाला. याचं उत्तर तुम्ही राज्यातल्या लोकांना द्या असे आवाहनही त्यांनी पवारांना दिले.