मुंबई: प्रतिनिधी
स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली होती. तेंव्हा या प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नांबाबात फक्त घोषणाच केल्या. फक्त तोंडाची वाफ केली.
विधान सभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
चार महिने उलटून गेले तरी अजून लोकसेवा आयोगावर सदस्यांच्या नियुक्ती बाबत सरकार उदासीन आहे. २०१९ साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळं अजूनही नियुक्तीसाठी झुरावं लागतंय अशी व्यथा मांडत कोरोना काळात लांबलेल्या परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचं वय वाढलं, त्यावर सरकारने वयोमर्यादा वाढविण्याची फक्त घोषणाच केली, प्रत्यक्षात मात्र कुठलीही अंमलबजावणी न करता बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या प्रस्थापितांनी फक्त पानं पुसल्याची टीकाही त्यांनी केली.
MPSC ते आरोग्य विभागातील पदभरतीत गोंधळ घालणाऱ्या सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रती नियत साफ नाही, त्यांच्या हेतुवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करतायेत. अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊन सदृष्य परिस्थिती होती. त्यामुळे एमपीएसएसीकडून परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांच्या प्रक्रिया आणि अन्य गोष्टी थांबविण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर एमपीएससी आयोगावरील सदस्यांच्या नियुक्त्याही थांबविण्यात आल्या होत्या. यापार्श्वभूमीवर पुण्यात स्वप्नील लोणकर या परिक्षार्थीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यावेळी अशा घटनांची पुन:रावृत्ती होवू नये म्हणून विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात सत्ताधारी महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर एमपीएसएसी आयोगावर सदस्यांच्या नियुक्त्या करून रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा केली होती.