मुंबई: प्रतिनिधी
मुंबईतील ३० वॉर्ड असे आहेत. ते शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. कायदा आणि कोरोनाचा विचार करुन निवडणुका घ्या. निवडणूक ही रणांगण असते आणि म्हणूनच जुन्या प्रसिद्ध डायलॉगची आठवण करुन देतो असे सांगत ते म्हणाले की, ‘बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है’, अशा शब्दात भाजपा आमदार अॅ़ड.आशिष शेलार यांनी शिवसेनेला आव्हान दिले.
भाजपा प्रदेश कार्यालयात आज पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना करीत असलेल्या कटकारस्थानांचा पर्दाफाश केला. यावेळी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय, विश्वास पाठक आदी उपस्थित होते.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीची चर्चा सुरू झाल्यापासुन शिवसेनेची खलबतं आणि कट कारस्थान सुरू आहेत. पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचे काम शिवसेना करते आहे, असा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केला.
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत ज्या घडामोडी सुरु आहेत. त्याबाबत आमचे बारीक लक्ष आहे. दिड वर्षापुर्वी कोरोनाची पहीली लाट आटोक्यात येताच त्यांचा पहिला डाव मुदत पुर्व निवडणुक घेण्याचा विचार झाला होता. पण दुर्दैवाने कोरोनाची दुसरी लाट आली आणि यांचा डाव फसला. दुसरा प्रयत्न असा केला की २०१७ मध्ये प्रभाग रचना आहे ती असंविधानिक आहे असं चर्चा सुरू केली. भाजपाने आपल्या फायद्याची प्रभाग रचना केली असे अर्ध्या अभ्यासावर वातावरण निर्माण केले गेले. पण ती वॉर्ड रचना २०२१ च्या जनगणनेच्या आधारावरच असल्याचे दिसून आले व हा प्रयत्न अभ्यास नसल्यामुंळे फेल ठरला. त्यासाठी मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना मोठ्या पगारावर घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
पुन्हा तिसरा प्रयत्न
कोरोनाची तिसरी लाट येतेयं, काळजी घेतली पाहीजे ही आमची सुद्धा भुमिका आहे. तिसऱ्या लाटेमुळे अनेक अडचणी येतील असा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत. पण त्याचा फायदा घेत जनगणना करता येत नाही. नवी मतदार नोंदणी करताना अधिक वेळ लागेल. त्यामुळे महापालिकेला दोन वर्षे मुदत वाढ देण्याचा प्रयत्न आता शिवसेनेचा सुरू आहे, असा आरोप करत ही भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला मान्य आहे का त्यांनी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.