हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली
हिंदू नववर्षच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणा-या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्यावेळेपासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्याही स्पष्ट सूचना आल्या नाहीत. त्यामुळे आज इलेक्ट्रॉनिक मिडियाशी बोलताना आमदार शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
ठाकरे सरकारने गुढीपाडव्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणूकांना परवानगी देण्याची स्पष्ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्या ज्या वेळी हिंदू सणंचा विषय येतो त्यावेळी ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो ? असा सवाल त्यांनी केला. तसेच मुंबई पोलीसांनी मुंबईत १० मार्च ते ८एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कलम लावण्यात आले आहे.
मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? असा सवाल करीत त्यांनी सरकारकडे मागणी केली की, संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून या दोन्ही सणांना परवानगी देण्यात याव्यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये आम्ही या मंडळ व समित्यांसोबत चर्चा करीत असून या उत्सवात भाजपा सहभागी होईल, असेही त्यांनी आज जाहीर केले.
