Breaking News

आयपीएलसाठी स्टेडियमध्ये ५० टक्के क्षमतेची प्रेक्षकांना परवानगी द्या गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूका जुन्या पध्दतीने घ्या-ॲड आशिष शेलार यांनी केली मागणी

आयपीएलसाठी वानखेडे, ब्रेबॉर्न, डि.वाय पाटील या स्टेडियममध्ये २५ टक्के ऐवजी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेत अर्थसंकल्पातील विभागवार चर्चे दरम्यान मत्सव्यवसाय, क्रिडा, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार विभागावर चर्चा करीत असताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईतील गावठाण, कोळवाडयातील प्रश्न अग्रक्रमाने मांडले. तसेच याचवेळी त्यांनी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका, मुंबईतील खेळाच्या मैदानांची लीज हे विविध विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले.

क्रिडा विभागावर बोलताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईत होणा-या आयपीएल सामन्यांबाबतच्या एका मुद्याकडे लक्ष वेधले. या सामान्यांसाठी स्टेडियमध्ये २५ टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियमची क्षमता पाहता तसेच त्यातील काही जागा शासनाला द्याव्या लागत असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना अत्यल्प जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे एमसीएच्यावतीने याबाबत क्षमता वाढवून देण्याची मागणी करण्यात येत असून शासनाने २५ टक्के ऐवजी ५० टक्के क्षमतेची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान या मैदानावर नव खेळाडू तयार करण्यात येतात पण या मैदानांचील खेळपट्टयांची लिज संपली असून शासनाने हे लिजचे तातडीने नुतनीकरण करावे अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी मुंबईतील गावठाण, कोळवाडयांच्या महत्वाच्या विषयांकडे लक्ष वेधताना आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील सायन, कुलाबा, धारावी,प्रिंसेस डॉक, वरळी, शिवडी, माहिमसह ८ कोळीवाडयांचे सिमांकन करण्याचे काम रखडले असून याबाबत महापालिकेने महसूल विभागाचे अभिप्राय नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात भाजपा सरकार असताना हे काम सुरू झाले होते. मात्र सध्या या कारणास्तव हे काम बंद असून जो पर्यंत सीमांकन होत नाही तोपर्यंत या मुळ मुंबईकरांच्या घरांचा पुर्नविकास होऊ शकणार नाही. त्यामुळे मुंबईतील सर्व गावठाण, कोळीवाडयांचे सिमांकन तातडीने करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

खार दांडा कोळीवाडयातील मासे सुकवण्यासाठी वापरात असलेल्या मोकळया जागेवर शासनातर्फे जसानी रिॲलिटी तर्फे एसआरए योजना राबविण्यात येत असून ही जागा कोळी बांधवांसाठी राखीव ठेवण्यात यावी. तसेच याच कोळीवाडयामध्ये जूहू कोळवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारताना बाजूला मोकळी जागा शिल्लक असून ही जागा कोळी बांधवांसाठी मासे सुकवण्यासाठी, बोटी नांगरण्यासाठी, बोटी दुरूस्तीसासाठी, जाळी विणण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

वरळीच्या कोळीवाडयातील बांधव गेले अनेक दिवस कोस्टल रोडच्या दोन खांबातील अंतर १६० मिटर असावे म्हणून आंदोलन करीत आहेत. जर हे अंतर १६० मिटर नसेल त्यांना त्यांच्या बोटी समुद्रात घेऊन येजा करणे शक्य होणार नाही. त्यांचा मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येईल. महापालिकेने जो अहवाल सादर केला त्यामध्ये जे नमुद केले आहे, त्यानुसार ही मागणी कोळी बांधव करीत असून शासनाने यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.

मुंबईतील ५० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्यासाठी शासनाने जो नविन उपविधी जाहीर केला आहे तो जाचक तर आहेच शिवाय तो वेळ आणि पैशाचा अपव्यय करणारा आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटयांमध्ये असंतोष असून त्यांच्या निवडणुका जुन्याच पध्दतीने घेण्यात याव्यात. मुंबईतील मान्यता प्राप्त अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू करण्यात आलेला नाही तो लागू करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *