देशातील लोकशाही संपलेली नाही. महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेने दोन दिवस सुरु असलेला तमाशा पाहिलेला आहे. ज्या माणसाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील घोटाळ्याची माहिती गोळा केली आणि केंद्रीय गृहसचिवांना दिली त्यांनाच तुम्हाला माहिती कुठून मिळाली असे विचारले जात आहे. तुम्हाला याची माहिती मिळालेली नाही ते आधी बघा. विरोधी पक्षांना याचे स्वातंत्र्य आणि अधिकार असतो. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष माजतो, नियंत्रणाच्या बाहेर जातो. अशावेळी विरोधी पक्षाने त्याच्यावर अंकुश ठेवायचा असतो. तो ठेवताना गोळा केलेली माहिती कुठून मिळाली हे सांगणे आवश्यक नसते. पण देवेंद्र फडणवीस पोहोचलेले खेळाडू असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिली.
प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला. देवेंद्र फडणवीस कोर्टाच्या विरोधात गेले नाहीत. गेल्या आठवड्यात त्यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला ते हिमालयाचे टोक आहे. सरकारला अजून नऊ दिवस अधिवेशन चालवायचे आहे. जरा जपून रहा असा इशारा त्यांनी दिला.
पुण्यात झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांना फुले पगडी घालण्यात आली होती. यापूर्वी पुण्यात पगडी घालण्यावरुन वाद झाले. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, पगडीवरून वाद करणारे मूर्ख असतात अशी उपरोधिक टीका करत फुले पगडी मला प्रिय आहे. मला फार छान वाटतंय म्हणून मी पगडी काढली नाही. पगडीवरून वाद करणारे मूर्ख असतात. महान नेत्यांच्या कर्तुत्वाला सोडून पगडीवरून भांडत नसतात असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते विरोधी फडणवीस यांना पाठविलेल्या नोटीसींची भाजपाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होळी करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले.