विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढत, एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम केलं आहे. बंडखोरी कशामुळे घडली, नेमकं काय घडलं याची माहिती नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात सांगितलं असतं की, ‘अजित, उद्धव ठाकरेंना सांग, अडीच वर्षे झालेत, आता अडीच वर्षे मला मुख्यमंत्रीपद द्या’ तर मीच उद्धव ठाकरेंना सांगितलं असतं आणि आम्हीच तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसवलं असतं. काहीच अडचण आली नसती असे सांगत मिश्किल टिपण्णी केली. अजित पवार यांच्या या मिश्किल टिपण्णीवरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या उत्तराला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत चांगलेच निरूत्तर केले.
अजित पवारांच्या टोलेबाजीला भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर देताना म्हणाले, एकनाथ शिंदेंनी अजितदादांच्या कानात नाही सांगितलं ती त्यांची चूक होती. पण तुम्हाला भविष्यात मुख्यमंत्री बनावं, असं कधी वाटलं तर आमच्या कानात मात्र नक्की सांगा असे उत्तर देत जयंत पाटलांच्या कानात कधीच सांगू नका, तिथे सांगाल तर धोका आहे. इच्छा होईल तेव्हा फक्त कानात सांगा असा टोलाही अजित पवारांना लगावला.
राहुल नार्वेकर हे आदित्य ठाकरेंच्या गुरुस्थानी आहेत. नार्वेकरांनी आदित्य ठाकरे यांना कायदा शिकवलंय. त्यामुळे आदित्य ठाकरे नार्वेकरांना गुरुदक्षिणा नक्की देतील. शिवसेनेत अजून काही आमदार उरलेत ते गुरुदक्षिणा म्हणून देतील असे म्हणत मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला.
सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार व आदित्य ठाकरेंना टोला लगावल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही त्यास तोडीस तोड प्रत्युत्तर देत म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना कानात सांगायला पाहिजे होते असं सांगितलं. आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितलं तसं ऐकलं असतं तर ही परिस्थिती अडीच वर्षापूर्वीच दिसली असती असा खोचक टोला लगावत कदाचीत याच्या उलट परिस्थितीही दिसली असती किंवा पलटलेली परिस्थितीही दिसली असती असा खोचक टोला लगावत मुनगंटीवारांना निरूत्तर करून टाकले.
दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार स्थिर दिसत असतानाच अचानक विधान परिषद निवडणूक झाली आणि शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केला. त्यामुळे सुरुवातीला या बंडामागे नेमकं कारण काय याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. यानंतर बंडखोरांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला आणि भाजपाशी जवळीक साधली.
तेव्हा भाजपा बंडखोरांसोबत येऊन सरकार स्थापन करेन आणि त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असाही कयास बांधला केला. मात्र, फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा केली.