मराठी ई-बातम्या टीम
विधानसभेत भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या कथित वक्तव्यावरून भाजपा अडचणीत सापडल्याचे दृष्य दिसल्यानंतर त्याचे उट्टे काढत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या मागणीवर भाजपाने चांगलेच महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलेच खिंडीत पकडले.
कालिचरण बाबाने महात्मा गांधींचा अपमान करणारे वक्तव्य केल्याप्रकरणाचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहितीचा मुद्दा (पाँईट ऑफ इन्फोर्मेशन) द्वारे उपस्थित करत फर्जीबाबा असलेल्या कालिचरणवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत केली.
छत्तीसगड रायपुर येथे सुरू असलेल्या धर्मसंसदेत मुळचे अकोल्याचे असलेल्या कालिचरण बाबाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. या फर्जीबाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी,अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
त्यावर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणाले की, महात्मा गांधी हे देशाच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. त्यांच्या विरोधात बोलणे हे निंदनीयच. मात्र सरकार तुमचे तुम्ही सरकारमध्ये मंत्री आहात आणि गृहमंत्री तुमचा आणि तुम्ही विधानसभेत कारवाई करण्याची मागणी करताय असा खोचक सवाल मलिक यांना करत ही मागणी करण्याऐवजी तुम्ही थेट तक्रार दाखल करून त्या कालीचरण बाबावर कारवाई करायला पाहिजे होती व त्यानंतर तुम्ही सभागृहात त्याची माहिती द्यायला हवी होती असा टोला लगावत महाविकास आघाडीच्या नेत्यांना खिंडीत पकडले.
त्यावर खडबडून जागे झालेल्या काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी अकोल्याच्या कालीचरण बाबाने केलेल्या अपमानाचा निषेध करत त्या बाबावर गुन्हा नोंदवून कारवाई करावी अशी मागणी केली.
त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महात्मा गांधीचा अपमान करणाऱ्या या कालीचरण बाबावर कारवाई करावी अशी मागणी करत राष्ट्रीय नेत्यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई झालीच पाहिजे.
परंतु महात्मा गांधी आणि पंडीत नेहरू यांच्यावर कोणीही टीका केली की काँग्रेसकडून सातत्याने त्या संदर्भात आवाज उठविला जातो. परंतु यावेळी पहिल्यांदाच काँग्रेस नेत्यांना महात्मा गांधीच्या अपमान करणाऱ्या वक्तव्याचा विसर पडत तो मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आणि विधानसभेत सुस्त असलेली काँग्रेस खडबडून जागी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.