भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपात येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरे ‘रात गई, बात गई’ असं म्हणाले, तर एकत्र येता येईल,” असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर येण्याबाबत काही संकेत दिलेत का या प्रश्नाचंही उत्तर दिलं. ते शुक्रवारी ७ एप्रिल रोजी एका खाजगी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखती दरम्यान बोलत होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकारणात लवचिकता फार महत्त्वाची असते. ताठरपणाने स्वतःचाही फायदा होत नाही, पक्षाचाही नाही आणि समाजाचाही फायदा होत नाही. उद्धव ठाकरेंनी म्हटलं पाहिजे की, त्या-त्या वेळी बोललो, त्यात मनापासून काही नाही. मात्र, ते काहीही बोलले तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही, असा इशाराही दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांचं मन किती मोठं आहे हे मला माहिती आहे. मात्र, काहीही बोलाल तर ते सहन करणार नाही. ‘हम किसी को टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे भी नहीं’. आम्ही कुणालाही त्रास द्यायला जात नाही. उध्दव ठाकरे ‘रात गई, बात गई’ असं म्हणाले, तर एकत्र येता येईल. मात्र, ‘नही मेरा दरवाजा बंद हैं’ असं उद्धव ठाकरेंनी ३३ महिने केलं. त्यांनी एकदाही असं म्हटलं नाही की, तू घरी ये, आपण एकत्र बसू. देवेंद्र फडणवीस असे दरवाजे बंद करणारे नाहीत, असं मतही व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून भाजपाबरोबर येण्याचे काहीही संकेत आलेले नाहीत. मी जसा भाजपाचा नेता आहे, तसाच एक माणूस आहे, महाराष्ट्राचा नागरिक आहे. घडणाऱ्या घटनांमुळे मी व्यथित होतो, त्यामुळे मी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी भाजपाबरोबर यावं असं म्हटलं. माझ्या पक्षात एवढं स्वातंत्र्य आहे. शरद पवारांच्या मागे गेल्याने पवारांनी अनेक नेत्यांची माती केली. तसेच ते पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची माती करतील अशी शक्यताही व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून फडतूस या शब्दावरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकावा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच देवेंद्र फडणवीस हे मोठ्या मनाचे आहेत. ते माफ करतील असंही पाटील म्हणाले होते.