Breaking News

विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार भूखंड लाटण्यासाठी असे कायदा बदल करण्यास सुरुवात -भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार

मराठी ई-बातम्या टीम
विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्‍यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल, एखाद्या “सचिन वाझे” सारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का? अशी प्रश्नांची सरबती करत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत काल निर्णय झाला. त्यामध्ये महाराष्‍ट्र सार्वजनीक विद्यापीठ कायद्या २०१६ मध्ये बदल केले असुन कलम ९(अ) हे नवीन कलम टाकून राज्यपालांचे अधिकार काढून घेण्याचे काम सरकारने केले आहे. पुर्वीच्‍या कायद्यानुसार कुलगुरू निवड करण्‍यासाठी राज्‍यपाल शोध समिती गठीत करीत असत ज्‍या समितीमध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवृत्‍त न्‍यायमुर्ती किंवा उच्‍च न्‍यायालयातील निवृत्‍त न्‍यायाधीश, बरोबरीने शिक्षण तज्ञ, पद्म पुरस्‍कार प्राप्‍त यासह उच्‍च शिक्षण विभागाचे सचिव अशी कमिटी गठीत करून ही समिती कुलगुरुपदासाठी अर्जदार व्‍यक्‍तींच्‍या कागदत्रांची छाननी करून त्‍यातील पाच नावांची शिफारस राज्‍यपालांना करीत असे. ठाकरे सरकारला हे मान्‍य नाही. निवृत्‍त न्‍यायमुर्ती, शिक्षण तज्ञ हे काहीही मान्‍य नाही. नवीन बदलानुसार कुलगुरू नियुक्‍तीसाठी सरकार एक समिती गठीत करणार असून त्‍यातील सदस्‍य पण राज्‍य सरकारच ठरवणार आहे. त्‍या समितीने जी नावे सुचविली जातील त्‍यातील दोन नावे कुलपती म्‍हणून राज्‍यपालांकडे मांडली जाणार आहेत. याचा सरळसरळ राजकीय अर्थ असा आहे की, यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवले जातील. यापुर्वी ठाकरे सरकारने केलेल्‍या नियुक्‍त्‍या पाहता एक नवीन सचिन वाझे विद्यापीठात नियुक्‍त करण्‍यात यावा यासाठी हे अधिकार राज्‍य शासनाने आपल्‍याकडे घेतल्याचा आरोप केला.
जो राजाबाई टॉवर एक काळ इंग्रजांसमोरही दिमाखात उभा राहिला त्‍या राजाबाई टॉवरला मंत्रालयासमोर झुकवण्‍याचे काम ठाकरे सरकार करते आहे. हाच अहंकार ठाकरे सरकारचा आहे. मी ठरवेन तेच धोरण मीच बांधेन तेच तोरण हीच ठाकरे सरकारची कार्यपध्‍दती असून विद्यापीठांच्‍या स्‍वायत्‍तेवर हे आक्रमण आहे. हे नव्‍याने नसून यापुर्वी ज्‍यावेळी अंतिम वर्ष विद्यार्थ्‍यांच्‍या परिक्षांच्‍या विषयात ही असाच अहंकारी निर्णय घेण्‍यात आला होता. यापुर्वी विद्यापीठाच्‍या निविदांमध्‍ये सुध्‍दा हस्‍तक्षेप करण्‍यात आला होता. विद्यापीठातील प्राध्‍यापक मंत्री कार्यालयात घेऊन पगार मात्र विद्यापीठांने द्यावे असेही करण्‍यात आले. अशा प्रकारे विद्यापीठांच्‍या निधीवर आक्रमण करण्‍यात आली असून आता एक पाऊल पुढे टाकण्‍यात आल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
भूखंड लाटण्यासाठी असे कायदा बदल करण्यास सुरुवात – आशिष शेलार
मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. भूखंड लाटण्यासाठी असे कायदा बदल करण्यास सुरुवात झाली आहे”, असा आरोपही त्यांनी केलाय. काही बातम्‍या त्‍याबाबत आल्‍या आहेत. एसआरएसाठी भूखंड देणे, काही रजिस्‍टर, रजिस्‍टर नसलेल्‍या काही संस्‍थांना भूखंड देणे सुरू आहे. त्‍यामुळे आपल्‍या मर्जीतील कुलगुरू विद्यापीठात बसविले जात असून भूखंड लाटण्‍यासाठी केलेले हे बदल असल्याचा भीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
भाजपाच्या युवा मोर्चाकडून विद्यापीठ बचाव हा कार्यक्रम घेण्यात येईल. मंत्री महोदय तुम्ही घेतलेले सर्व निर्णय अधिकारांचे केंद्रीकरण करणारे आहेत, विद्यापीठांची गुणवत्‍ता कशी वाढेल याबाबत कधी चर्चा का केली नाही, असा सवाल करत हा विद्यापीठांवर हा घाला असून महाराष्‍ट्रातील नागरीकांनी या विरोधात व्‍यक्‍त व्‍हायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
करण जोहरच्या “त्‍या” पार्टीमध्‍ये एक मंत्री होते का?
करण जोहर यांच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीत असलेल्या तिघांना कोरोना झाला अशा बातम्या वाचल्या त्‍या सत्‍य मानून मी बोलतो आहे. अधिका-यांशी बोलल्‍या नंतर माहिती मिळाली की, सीमा खान, अमृता अरोरा आणि करीनाला कोरोना झाला. याबाबत महापालिकेला पत्र लिहून तीन प्रश्‍न विचारले आहेत, करण जोहरच्या घरी जी पार्टी होती त्यात किती लोक सहभागी होती?. त्या सर्वांची टेस्ट झाली का?, मनपाचे अधिकारी सांगत आहेत त्‍या पार्टीत आठच लोक होते हे आठच लोक होते हे कशावरून ठरवले?, असे मी प्रश्न पालिकेला विचारले. यावर पालिकेच्‍या अधिका-यांनी सांगितले की, आम्‍ही बाधीत लोकांशी चर्चा केली. सीमा खान यांनी काही नावे सांगितली, काही नावे गाळली होती लपवली होती. मग अधिकारी म्‍हणाले, की आम्‍ही स्‍वतः करिना कपूर यांच्‍याशी बोललो. त्‍यांनी काही नावे सांगितली. यावरून असे दिसतेय की, यामध्‍ये संभ्रम निर्माण होतो आहे. म्‍हणून आम्‍ही पालिकेला प्रश्‍न विचारला आहे की, सदर इमारतीचे सीसीटीव्‍ही फुटेज घेतले आहे का?, ही पत्रकार परिषद घेईपर्यंत पालिकेने उत्‍तर नाही असे दिले आहे. त्‍यामुळे संशय बळावतो आहे. म्‍हणून ज्‍या पध्‍दतीने संभ्रमाचे वातावरण दिसते आहे त्‍यावरून पालिकेला असा सवाल आहे की, या पार्टीत राज्‍य शासनातील कोणी मंत्री होता का?, हा संशय बळावयाचे नसेल तर त्‍या इमातीचे सीसीटीव्‍ही फुटेज जाहीर करावे. जी माहिती समोर आली त्‍यामध्‍ये त्‍या पार्टीमधील अन्‍य लोकांनी पालिकेकडून टेस्‍ट केलेल्‍या नाहीत. त्‍यांनी हरकिशनदास रूग्‍णालयात चाचण्‍या केल्‍या आहेत.
या पार्टीत किती लोक होती?, असा संदेह निर्माण होत आहे, त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कुणी मंत्री होता का? पालिकेने सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जर कुणी मंत्री असेल तर त्याने पुढे यावे. कुणी मंत्री त्या पार्टीला होतं का त्याची स्पष्टता असावी, जन आरोग्‍याची खेळू नये, असेही ते म्‍हणाले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *