Breaking News

भाजपाच्या कोअर कमिटीत काय ठरलं? अॅड आशिष शेलार यांनी दिली ही माहिती आघाडीला सळो की पळो करणार

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील जनतेला जी मदत, सेवासुविधा मिळणे आवश्यक आहे, त्या गोष्टींचा विकास महाविकास आघाडी करू शकत नाहीत. शेतकऱ्याला काहीही मिळत नाही, विद्यार्थ्याला मिळत नाही, बारा बलुतेदारांचा मिळत नाही, आमच्या दलित समाजाच्या बंधू-भगिनींना मिळत नाही, मराठा समाजाला मिळत नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषा सुध्दा आज आम्ही ठरवली असून येणाऱ्या काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला सळो की पळो करुन सोडू असा इशारा भाजपाचे मुख्य प्रतोद अॅड. आशिष शेलार यांनी भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीनंतर यांनी प्रसार माध्यमांना दिली.

महाविकास आघाडीच्या कुकृत्याचं, कारभाराचा आणि भ्रष्टाचार याविषयी एक पेपर काढून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकार याबद्दल बदनामीचा कट सुनियोजितपणे तिन्ही पक्ष एकत्र कसे रचत आहेत याचा भांडाफोड आम्ही जनतेसमोर करणार आहोत. आपल्या खोट्या कल्पनांवर स्वतःच्या विजयाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो सफल होऊ शकत नाही. महाराष्ट्रातली जनता त्याला थारा देऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कोअर कमिटीची बैठक आज आमच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाली. केंद्रीय प्रभारी सी.टी रवी, पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री शुक्लाजी, सह प्रभारी पवय्या, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बैठक झाली. त्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि सर्व सदस्य उपस्थित होते.

राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा आणि लेखाजोखा आज आम्ही घेतला. अतिशय नम्रतेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे राज्यातील ९७ हजार ३१५ बुथपैकी ९२ हजार ८९१ बुथपर्यंतची रचना लागलेली आहे. एक बुथ प्रमुख आणि बरोबर समिती अशी याची संपूर्ण रचना आहे.

आज अतिशय विनम्रतेने हे सांगावंसं वाटतं की, संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष चांदा ते बांदा काम करतो असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

संपूर्ण महाराष्ट्रात फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत आहे. सत्तेत असलेले तीन पक्ष हे काही विभागत असलेले पक्ष असुन कोणी पुणे, मुंबई तर कोणी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही पक्ष पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागापुरते मर्यादित आहेत. आघाडीतील एक पक्ष जिथे आहे तिथे दुसरा नाही. काही ठिकाणी त्यांची आपापसात मारामारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्णपणे केवळ भारतीय जनता पक्षाच्या बुथ ते विधानसभेपर्यंतची रचना आम्ही पूर्ण करू शकलो. त्याचा लेखाजोखा या बैठकीत आम्ही घेतला.

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आमच्या कल्पने नुसार महाराष्ट्रात एका अर्थाने मिनी विधानसभेच्या निवडणुका होतील. जवळजवळ २७४ नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, खरेदी-विक्री संघाच्या, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत . त्यामुळे त्यांची पूर्ण रचना आम्ही केली असून, शत-प्रतिशत भाजपा हाच आमचा नारा असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तिघाडीतील तिघांनी मिळून यावे, आपापसात पायात पाय घालून यावे, या निवडणूका जिंकण्यासाठीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. त्यासाठी आवश्यक व्यक्ती, परिवार, संघटना याबाबतच्या योजना आमच्या तयार आहेत. दिवाळीच्या नंतर एक चिंतन बैठक आमची होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या संपर्कात आजही काही लोक, परिवार, स्थानिक नेतृत्व आहेत. आजच त्याबाबत अधिक बोलता येणार नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे पदाधिकारी यांचे दौरे आणि प्रवास आता सुरू होतील. निवडणूका जिंकण्यासाठीचा आराखडा तयार झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांमध्ये जवळजवळ १५ विधानपरिषदेच्या निवडणुकांमधील सुद्धा आमच्या ताकदीच्या आधारावर अधिकचे यश मिळेल, याचे राजकीय विश्लेषण सुध्दा आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपा कडून एका परिवाराला टार्गेट जात आहे असा राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करुन चोर मचाए शोर, असा उपरोधिक टोला त्यांनी नवाब मलिक यांना लगावला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *