मराठी ई-बातम्या टीम
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून विधान परिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या निवडणूकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक राहीलेला असताना निश्चित केलेला उमेदवार ऐनवेळी काँग्रेसने बदलल्याने काँग्रेसकडूनच उमेदवारी दिलेले डॉ.रवींद्र भोयर हे तोंडघशी पडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच हा उमेदवार बदलला असल्याचा आरोप भाजपाचे माजी मंत्री आणि या निवडणूकीतील भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत पटोले यांच्या या कृतीमुळे राजकारणातील विश्वासर्हतेला तडे गेल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसकडून डॉ.रवींद्र भोयर यांना भाजपातून काँग्रेसमध्ये घेण्यात आले. तसेच त्यांना उमेदवारीही देण्यात आली. परंतु ऐनवेळी कोणतीही सूचना न देता त्यांची उमेदवारी काढून घेत काँग्रेस अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. काँग्रेसच्या या कृतीमुळे भोयर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, उमेदवारी काढून घेताना किमान मला सांगायला तरी होते. पण अशी कोणतीही गोष्ट करण्यात आली नाही. त्याचबरोबर मी निवडणूक लढविण्यास असमर्थ आहे असे कधीही सांगितले नव्हते. तरीही माझी उमेदवारी काढून घेतल्याचे स्पष्ट केले.
परंतु महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून डॉ.भोयर यांच्या या खुलाश्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. नाना पटोले हतबल झाले आहेत आणि काँग्रेसला न्याय देऊ शकणारे नाहीत. दोन मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र काँग्रेसला आपला निर्णय बदलावा लागला हे अत्यंत लाजिरवाणे चित्र आहे. काँग्रेसच्याच दोन मंत्र्यांनी दबाव टाकल्याने नाना पटोलेंनी उमेदवार बदलला. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पक्षाच्या मंत्र्यांवरच त्यांचे नियंत्रण नाही. ही महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्र्याच्या दबावाखाली काम करणारे असाल तर प्रदेशाध्यक्ष बनण्याच्या लायकीचे नाही आहात. १३ दिवसांच्या प्रचारानंतरही उमेदवार बदलावा लागतो. यापेक्षा नामुष्की आणि शरमेची बाब कोणतीही नाही. असा हतबल प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला न्याय देऊ शकत नाही. मंत्र्यांवर कारवाई करायची की नाही हा काँग्रेसचा निर्णय आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसची वाट लागणार असल्याचे भाकितही बावनकुळे यांनी यावेळी केले.
भाजपाकडे ३१८ मतांचे बहुमत आहे. त्यामुळे कुठलीही चिंता आम्हाला नाही आहे. मी निवडणुक योग्य पद्धतीने लढलो आहे. त्यामुळे विजय हा १०० टक्के नक्की आहे. ३१८ मतं ही भाजपाची आहेत त्यावर जी मिळतील ती महाविकास आघाडीची फुटलेली असतील असेही त्यांनी सांगितले.