भारतीय जनता पक्षाने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्याबदद्ल भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने जनता विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली अवमानजनक वक्तव्ये भाजपाला मान्य आहेत का? महापुरुषांचा अपमान करत असताना भाजपाची तोंडे बंद का होती? असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला केला.
राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रे दरम्यानचा एक एडिटेड व्हिडिओ नुकताच काँग्रेसकडून जारी करण्यात आला. या व्हिडिओत राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत तो व्हिडिओ डिलीट करावा आणि देशाची माफी मागावी अशी मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले.
नाना पटोले म्हणाले, भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यावर भाजपाने नाहक आरोप करणे बंद करावे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांनी जनतेची माफी मागितलेली नाही असेही म्हणाले.
यावेळी बोलताना नाना पटोले यांनी शिवछत्रपती स्मारकावरून सवाल करताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन केले त्याचे काय झाले? याचे उत्तर आधी द्या. भाजपाला महापुरुषांच्या विचारांशी काहीही देणेघेणे नाही. भाजपा त्यांचा फक्त मतांसाठी वापर करते. भाजपाने त्यांचे थोतांड बंद करावे अशी टीकाही केली.
भाजपाचे हिंदुत्व नकली आहे. गोव्यात गोमातेबद्दल काय भुमिका आहे आणि महाराष्ट्रात काय भूमिका आहे हे सर्वांना माहित आहे. स्वतःच्या सोईने हिंदुत्वाचा वापर करणाऱ्या भाजपाची खरा चेहरा जनतेला माहित आहे. त्यावर त्यांनी आम्हाला शिकवू नये असा पलटवारही केला.