Breaking News

संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावर म्हणाले, डरो मत हा आमचा… यात्रेत सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना मारली मिठी

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचताच त्यावेळी तीन महिन्यापासून तुरुंगात असलेले उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर होत ते तुरुंगातून बाहेर आले. त्यावेळी संजय राऊत हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र त्यावेळी संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे टाळले. मात्र नुकतीच ही यात्रा जम्मू काश्मीरात पोहोचल्यानंतर संजय राऊत हे या यात्रेत सहभागी झाले. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत संजय राऊत यांनी पहिला टप्पा पूर्ण केला. यावेळी संजय राऊत यांना राहुल गांधी यांच्यासोबत काय चर्चा झाली असे विचारले असता ते म्हणाले, डरो मत हा त्यांचा आणि माझा सामायिक मुलमंत्र आहे. राहुल गांधी यांनी उध्दव ठाकरे यांची चौकशी करत महाराष्ट्रातील राजकारणाची माहिती घेतली.

राहुल गांधी स्वेटर का घालत नाहीत? हे मी त्यांना विचारलं नाही, कारण मी राहुल गांधी यांना ओळखतो. त्यांची जीवनचर्या मला माहित आहे. मी राहुल गांधींसोबत चाललो त्यावेळी राहुल गांधी यांनी माझी काळजी केली. ते म्हणाले, तुम्ही आत्ताच मोठा त्रास सहन करून आला आहात. त्यामुळे जास्त चालू नका. पण मी त्यांच्यासोबत पहिला टप्पा पूर्ण केला.

राहुल गांधींनी मला भेटल्यावर मिठी मारली कारण ते नेहमी मला प्रेमानेच भेटतात. गुरूवारपासून ते माझी वाट बघत होते. गुरूवारी मी येईन असं त्यांना वाटलं होतं. ज्या कंटेनरमध्ये राहुल गांधी राहात आहेत, तिथेच ते गुरूवारीही राहिले. पावसामुळे चिखल झाला होता, तरीही ते तिथेच थांबले होते. या यात्रेत लोकं खूप उत्साहाने सहभागी होत आहेत. आम्ही १२ किमी एकत्र चाललो. जम्मूतले शिवसैनिकही या ठिकाणी चालले. बाळासाहेब ठाकरे जिंदाबादच्या घोषणाही त्यांनी दिल्या. ५० खोके एकदम ओके या घोषणाही दिल्या. मला राहुल गांधींनी सांगितलं बघा महाराष्ट्रातली घोषणा देत आहेत.

माझ्याकडे राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंचीही चौकशी केली. मला का अटक केली हे राहुल गांधी यांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी माझी त्यासंदर्भातली चौकशी केली आहे. डरो मत हा त्यांचा आणि माझा सामायिक मंत्र आहे. माझ्या घरातल्यांचीही चौकशी राहुल गांधी यांनी केली. मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी यांनी चौकशी केली होती.

महाराष्ट्राच्या राजकारणावर आमच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते महाराष्ट्राला सांगणं म्हणजे नवा वाद निर्माण करणं होईल. आम्ही अनेकदा चर्चा करतो. आज चालत असताना आम्ही या विषयावर बोललो. मात्र काय चर्चा झाली ते मी आत्ता सांगणार नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांच्याकडे बरीच पक्की माहिती असते. शिवसेनेचं संघटन कसं मजबूत आहे? आमदार, खासदार गेले म्हणून पक्ष संपत नाही यावर आम्ही चर्चा केली असंही संजय राऊत यांनी सांगितले.

ही यात्रा हुकूमशाहीच्या विरोधातही आहे. देशात आज सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. काँग्रेस पक्षाशिवाय विरोधी पक्षांची आघाडी किंवा ऐक्य शक्य नाही. काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी निर्माण करत असतील तर ते भाजपाला मदत कत आहेत. काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी पूर्ण होऊ शकत नाही. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस हा मोठा पक्ष आहे हे विसरता येणार नाही असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *