राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती, प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रपती, पंतप्रधान यांची सदिच्छा भेट घेतली
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची ६ ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची १७ अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ७, लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित चांगले उपचार द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश
मेळघाटमध्ये दुषित पाणी पिल्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास खासगी रूग्णालयात दाखल करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिका-यांना दूरध्वनीद्वारे दिले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे ५० जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ दखल घेत दिल्ली दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. दुषित पाण्याने बाधा झालेल्या व्यक्तींना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास त्यांना खाजगी, मोठ्या रुग्णालयात दाखल करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
दुषित पाण्याने बाधा झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू असून, आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन सतत संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळावेत, तसेच यापुढे हानी टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे. कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.