मुंबई: प्रतिनिधी
मागील दिड वर्षापासून राज्याच्या ग्रामीण भागातील आठवडी बाजार, कला केंद्रे, यात्रा आदी गोष्टी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले आहेत. मात्र शहरी भागात सध्या काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. त्या धर्तीवर या बंद करण्यात आलेल्या गोष्टी पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीनंतर व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. राज्यात कला केंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी सांगितले.
अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्यासह शिष्टमंडळाने आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना आपल्या महासंघाचे निवेदन दिले.
राज्यातील तमाशा, लावणी आणि लोक कलावंतांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोककलावंतासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, अधिवेशनाच्या काळात पारंपारिक लावणी कलावंतांचा राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित करणे, वृध्द कलावंत यांना मानधनामध्ये वाढ मिळावी, राज्यातील पारंपारिक लावणी आणि तमाशा कलावंतांच्या घरसंकुलासाठी पुणे येथे ५ एकर जागा मिळावी, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत असणाऱ्या समितीवर लावणी, तमाशा आणि लोककलावंतांना प्रतिनिधीत्व मिळावे अशा काही मागण्या या बैठकीदरम्यान शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांच्यासमोर मांडल्या.