शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर जवळपास महिन्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आज सामना या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत आज प्रसारीत करण्यात आली. या मुलाखती दरम्यान उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकाही बंडखोराचे आमदाराचे नाव न घेता म्हणाले जे गळाले ते पालापाचोळा अशी खोचक टीका केली. या टीकेवरून भाजपाचे आमदार आशिष शेलार चांगलेच संतापले.
यावेळी आशिष शेलार बोलताना म्हणाले की, ट्रेलर दणक्यात असतो, पिक्चर डब्यात जातो असा टोला त्यांनी मुलाखतीवर लगावला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान आहे असा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपामुळे आहे. भाजपाला बोलणं, टोमणे मारणं असं केलं तरच यांना महाराष्ट्रात स्थान असेल अशी स्थिती आहे. ही वाईट खोड काही सहजासहजी जाणार नसल्याची टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. मुख्यमंत्र्यांना घालून पाडून बोलणं, अपमानित करणं हे महाराष्ट्राला मान्य नाही. यावर सुप्रिया सुळे काही बोलणार आहेत का? हा महाराष्ट्रद्रोह होत नाही आहे का? असा सवालही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला.
उद्धवजी तुम्ही सतेत असताना जसे वागलात, तसे आम्ही अजिबात वागणार नाही. तुम्ही मुख्यमंत्री असताना जो तुम्हाला प्रश्न विचारेल त्याच्या घरात घुसून तुम्ही मुंडण करत होतात. जो सोशल मीडियावर तुम्हाला अनपेक्षित गोष्टी बोलेल त्यांचे डोळे फोडले होते. जे पत्रकार, संपादक सरकारी धोरणाविरोधात बोलले, त्यांना घरातून अटक केली आहे. आज आम्ही असे वागणार नाही. पण तुम्ही जर आज मुख्यमंत्री असता आणि कोणी तुमचा सामनाच्या मुलाखतीत आहे तसा उल्लेख केला असता, तर तुमचे लवंडे, कार्यकर्ते कसा वागला असता याचा विचार करा असा सूचक इशाराही उध्दव ठाकरे यांना दिला.