राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीला जवळपास ९ महिन्याचा कालावधी उलटून गेला. तसेच या नऊ महिन्यात शिंदे गटाकडून आणि ठाकरे गटाकडून सातत्याने वेगवेगळे खुलासे आतापर्यंत करण्यात आले. त्यानंतर आता पहिल्यांदाच बंडखोरी होण्यापूर्वी मातोश्रीवर गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी काय केले आणि काय कारण सांगितले याबाबतचा नवा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या विषयावरून पुन्हा गदारोळ सुरु झाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांना लक्ष्य केले.
आदित्य ठाकरे म्हणाले, हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट केला.
या प्रकरणावरून दीपक केसरकर यांनी आक्रमक प्रतिक्रिया देताना म्हणाले, उद्धव ठाकरेंची एक मुलाखत तुम्ही बघा. त्यात ते म्हणाले की ‘मी एकनाथ शिंदेंना बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी मुख्यमंत्रीपद सोडतो. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते’. हे स्वत: उद्धव ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंना खोटं कसं बोलावं याचं ट्रेनिंग चाललेलं दिसतंय. त्यांनी त्यासाठी एक एजन्सी नेमलेली आहे, असा खोचक टोला लगावला.
आदित्य ठाकरेंच्या या दाव्याला दुजोरा देणाऱ्या संजय राऊतांनाही केसरकरांनी लक्ष्य केलं आहे. संजय राऊत कशालाही दुजोरा देतील. ते वाट्टेल ते बोलतात. तेही मुख्य प्रवक्ता आहेत आणि मीही. पण बोलण्याला एक मर्यादा असावी लागते. ती कुणीही सोडू नये. महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठल्या स्तरावर न्यायचं यालाही मर्यादा आहे, असा उपरोधिक टोलाही संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.