अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक मनी लॉड्रींग प्रकरणी अटक केल्यानंतर मलिक यांनी ईडीच्या कारवाई विरोधात हेबाब कार्पोस याचिका दाखल करत अटक कारवाईला आव्हान दिले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सध्या तरी मलिक हे लगेच बाहेर येण्याची शक्यता दिसत नसल्याने अखेर गुरूवारी रात्री उशीरापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नेत्यांच्या बैठकीत नवाब मलिक यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झालेत. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्यणानुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राजेश टोपे यांच्याकडे नवाब मलिक यांच्याकडे असणारे दुसऱ्या कौशल्य विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन विभागांबरोबरच नवाब मलिक यांच्याकडे असणारी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आलीय. ही जबाबदारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर परभणीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दल सांगताना नवाब मलिक यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आल्याचे सांगत, नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या दोन-चार दिवसांत पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचे आम्ही ठरवलं आहे.
मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद नवाब मलिकांकडे आहे आणि लवकरच मुंबई महापालिका निवडणुक आहे. यापार्श्वभूमीवर नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि आज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार असून नवाब मलिक उपलब्ध नसल्याने पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासमवेत करतील.
उद्याच (शुक्रवारी) मी मुख्यमंत्र्यांनी मी पत्र पाठवून आमच्या पक्षाकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना कळवला जाणार आहे, मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील. नवाब मलिकांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या विभागाचं काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळेच ही जबाबदारी दुसऱ्या मंत्र्यांना देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.