Breaking News

मुद्दा होता तरूणीच्या अपहरणाचा पण नवनीत राणा यांनी विषय लावून धरला रेकॉर्डींगचा पोलिस स्थानकातच फोन कॉल रेकॉर्डिंग का केला म्हणून पोलिसांना विचारला जाब

उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही हिंदू-मुस्लिम वाद आणि लव जिहादचा मुद्दा तापविण्याच्या भाजपाच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी एका मुस्लिम मुलाने हिंदू तरूणीचे अपहरण केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे ही घटना अमरावती जिल्ह्यातील असल्याचाही गौप्यस्फोट केला. त्यानंतर याप्रश्नी राजापेठ पोलिस स्थानकात पोलिसांना जाब विचारण्यासाठी भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा या स्थानिक पोलिस स्टेशनला गेल्या खऱ्या मात्र त्यांनी आमचे फोन कॉल रेकॉर्डिंग का करताय म्हणून पोलिसांना जाब विचारायला सुरुवात केली.

अमरावतीतील एका वीस वर्षीय हिंदू तरुणीचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिचा बळजबरीने आंतरधर्मीय विवाह करण्यात आला, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. तसेच तरुणीला शोधून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करा, अशी मागणी करीत नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह येथील राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली.

हिंदू तरुणीला डांबून ठेवण्यात आले असून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतानाही तो काहीही माहिती देण्यास तयार नाही. पोलीसही तत्परतेने कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. आपण जेव्हा राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना या संदर्भात विचारणा करण्यासाठी फोन केला, तेव्हा त्यांनी आपले संभाषण ध्वनिमुद्रित केले हा हक्क त्यांना कोणी दिला असा सवाल नवनीत राणा यांनी केला. यावेळी त्यांची पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याशी चांगलीच बाचाबाची झाली. राजापेठ पोलीस ठाण्यात सध्या तणावाचे वातावरण आहे.

यासंदर्भात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनीही पोलिसांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला आहे. काल संशयित आरोपीला अटक करण्यात येऊनही, पोलीस तरुणीचा ठावठिकाणा शोधण्यात अपयशी ठरले आहेत. पोलिसांनी तात्काळ या तरुणीचा शोध न घेतल्यास आम्हाला कायदा हातात घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा कुळकर्णी यांनी दिला.

दरम्यान राज्याचे गृह खाते भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तरीही भाजपाचे प्रवक्ते हे पोलिस अकार्यक्षम असल्याचा आरोप करत आहे. यावरून अप्रत्यक्षपणे भाजपाचे पदाधिकारी हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच दोषारोप ठेवत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा

आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींविषयी त्यांनी केलेले द्वेषपूर्ण भाषण आणि जातीय आधारावर मतदान करण्याचे आवाहन त्यांच्या जिंकण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *