शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर झालेल्या भाजपाच्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात गतवेळी पेक्षा यावर्षी मुंबई महापालिकेत जास्त जागा निवडूण आणायच्या आणि भाजपाचा भगवा फडकाविण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहिर केले. त्यानंतर मागील काही दिवसांमध्ये भाजपाकडून विशेषत: आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना उद्देशून पेग्वीन सेना असे खोचक टीकाही करायला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी आज ट्विट करत पब, पेग आणि पार्टीवाल्या पेग्वीन सेनेला ध्वनी प्रदुषणाची सवय लागली असल्याची खोचक टीका केली.
मुंबईतील सर्व सोयीसुविधा गुजरात पळवून नेण्याचा डाव भाजपाचा आहे, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मुंबईतून सगळं गुजरातला नेलं जातंय, या सेनेच्या टीकेचा भाजपा नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी शिवसेनाचा उल्लेख पब, पेग आणि पार्टीवाली पेंग्विन सेना असा केला आहे.
शेलारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, देशातील सर्वात जुने विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सिप्झमध्ये भारत सरकारकडून २०० कोटी रुपये खर्च करून विशेष केंद्रीकृत सुविधा (सीएफसी) उभारण्यात येत आहे. याच्या माध्यमातून ५ लाख रोजगार आणि ३० हजार कोटींच्या निर्यातीचे उदिष्ट ठेवण्यात आलं आहे. याची नुकतीच पायाभरणी झाली आहे.
अन्य एका ट्वीटमध्ये त्यांनी पुढे म्हटलं की, बीकेसीत भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस आणि त्यावर आयएफएससी उभे राहणार आहे. सोबतच ७ मेट्रो धावू लागतील. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार! आमचं ठरलंय! पण पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते, असे ध्वनिप्रदूषण करण्याची नशाच चढलीय अशी खोचक टीकाही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली.
दरम्यान, आयएफएससी अर्थात आतंरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र युपीए सरकारच्या काळात मंजूर झालेलं नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातला नेण्यात आलं. त्यासंदर्भातील नोटीफिकेशनही केंद्र सरकारची सर्वांच्या पाहण्यात आली. मात्र त्याचं दुसरं केद्र मुंबईत उभारणार असल्याची कोणतीही घोषणा केंद्र सरकारने केली नाही किंवा सुतोवाच केला नाही. तरीही आशिष शेलार यांनी ही माहिती कोणत्या आधारावर दिली याबाबत प्रश्न निर्माण होत आहे.
बीकेसीत भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस त्यावर आयएफएससी उभे राहणार. सोबत 7 मेट्रो धावू लागतील. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार!आमचं ठरलंय!
पण
पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते, असे ध्वनिप्रदूषण करण्याची नशाच चढलेय!
(2/2)— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) September 4, 2022