उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या उत्तर प्रदेशातील योगींचे सरकार जाणार असल्याचे भाकित करत पंजाब बद्दल सांगणे कठीण असल्याचे वक्तव्य केले. मात्र आज या पाचही राज्यांचे निकाल जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, पंजाबमध्ये हा जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच. मात्र हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे.
पंजाब असे एक राज्य होतं ज्याठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळं चित्र बघायला मिळत आहे. ‘आप’ हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणूकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले. ज्यापध्दतीने प्रशासन दिले त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. पंजाब हे दिल्लीच्या दृष्टीने. सीमेवरील राज्य आहे. दिल्लीच्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये ‘आप’ ला झाला असं स्वच्छ दिसते असेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी लोकांनी जे सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली व भाजपाचं राज्य स्थापन झाल्याचे मत व्यक्त करत लोकशाहीत लोकांनी कौल दिला त्याचा स्वीकार व सन्मान करायला हवा असेही ते म्हणाले.
आज देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्च पासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. पुढची नीती ठरवण्याची पाऊले उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे असेही त्यांनी सांगितले.
भाजपाकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असे बोलले जात असल्याचा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केला असता ठिक आहे ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’ असा स्पष्ट इशारा त्यांनी देत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.