गुढी पाडव्याच्या मेळाव्या दरम्यान भाजपाच्या मस्जिदीवरील भोग्यांचा विषय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलून धरत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांची रेलचेल राज ठाकरे यांच्या घरी वाढलेली असून काल रात्री केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज यांची भेटच घेतली. त्यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांनी आज त्यांच्याशी संवाद साधून मनसे-भाजपाच्या संभाव्य युतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, काळाच्या पोटात काय आहे हे आता सांगणे अवघड असल्याचे सांगत युतीच्या मुद्यावरून स्पष्ट बोलणे टाळले.
गुढी पाढव्याच्या काही दिवस आधी भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तर पाडव्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय परिवहन आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर दानवे हे तिसरे नेते आहेत.
मुंबईत रेल्वेच्या जागेवर काही झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या हटवण्याची नोटीस सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांनी या झोपडपट्ट्या हटवण्याची मागणी केली होती. यानंतर मी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या बैठकीत या झोपडपट्ट्या हटवू नये, असं म्हटलंय. तर, या झोपड्या हटवण्याच्या विषयासंदर्भात मी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्याच प्रमाणे मी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संभावित मनसे-भाजपाच्या युतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, काळाच्या पोटात काय आहे, हे आता सांगण कठीण आहे. परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेवरून विरोधकांच्या पोटात दुखतंय. मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात राज ठाकरे बोललेत तर आघाडीमधील नेत्यांना चांगलं वाटतं, पण जर त्यांच्याविरोधात बोलले तर मात्र त्यांच्या पोटात दुखतं. एखाद्याच्या कामामुळे त्याच्याबद्दलचं मत बदलू शकतं. मोदींवर टीका केल्यानंतर राज ठाकरेंना आघाडीतील नेत्यांनी डोक्यावर घेतलं होते. परंतु आज त्यांच्यावर टीका केली, तर ते नाव ठेवायला लागले. अलिकडे झालेल्या निवडणुकीत पाच राज्यांपैकी चार राज्ये आम्ही जिंकली, त्याचं कौतुक फक्त राज ठाकरेंनी केलं. चांगल्या कामाचं कौतुक नको का करायला? असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राज ठाकरेंनी त्यांचं परप्रांतीयांबद्दलचं धोरण बदलल्यास भाजपा-मनसे युती होणार ही शक्यता नाकारता येत नाही. कारण जेव्हा वेगळ्या विचारधारेचे राजकीय पक्ष सोबत येतात, तेव्हा काही तडजोडी कराव्या लागतात आणि काही मुद्दे सोडून द्यावे लागतात असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.