गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात मस्जिदीवरील भोंग हटविण्यासह मदरशांवर धाडी टाकण्याबाबत आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणार असल्याचे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्यावेळी जाहीर केले होते. तसेच जर मस्जिदीवरील भोंगे नाही उतरवले तर मस्जिदीसमोर मोठे भोंगे लावत हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा दिला. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी यासंदर्भात बोलण्याअगोदरच किंवा तसे पत्र लिहिण्याआधीच नाशिकच्या मनसे जिल्हाध्यक्षाने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवित भोंगे हटविण्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै २००५ च्या जनहित याचिकेवरील निकालात मशिदींवरील भोंग्यांमधून उच्चस्वरात करण्यात येत असलेल्या घोषणांमुळे सार्वजनिक शांततेत भंग होत असून प्रत्येक भारतीयास घटनेने कलम २१ अन्वये दिलेल्या जगण्याच्या अधिकारात ध्वनी प्रदूषणामुळे व्यत्यय येत असून मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिल्याची बाब या पत्राद्वारे अमित शाह यांच्या नजरेस आणून देण्यात आली आहे.
राज ठाकरेंनी दिलेल्या ३ मेपर्यंतच्या मुदतीस अकारण धार्मिक रंग देत विविध पक्षातील नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य करण्यात येत आहेत. राज्यातील गृहमंत्री या संवैधानिक पदावर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात येणार नसल्याचं वक्तव्य करत राज्यातील पोलीस सज्ज असल्याचा दिलेला इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं स्पष्ट उल्लंघन आहे असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनेच यासंदर्भात पुढाकार घेवून राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणीही या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली.
राज ठाकरे यांच्या भोंगे विरूध्द आरतीच्या आंदोलनाच्या निर्णयामुळे मनसेचे अनेक नेते मनसेला सोडचिठ्ठी देत आहेत. तर दुसऱ्याबाजूला पुण्यातील वसंत मोरे यांनी राज यांच्या या आदेशावर आपण असे कोणतेही आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट करत मनसेच्या अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शविली.
आता राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी बोलण्याची वेळ न पाहताच नाशिकच्या मनसेने अमित शाह यांना पत्र पाठविल्याने राज ठाकरे यांच्यापेक्षा त्यांचे कार्यकर्त्येच पुढे असा संदेश जात असल्याची चर्चा दस्तुरखुद्द मनसेमध्येच सुरु झाली आहे.