मागील काही दिवसांपासून ब्राम्हण समाजाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्याबाबत रोष व्यक्त करण्यात येत होता. तसेच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडूनही थेट नसले तरी अप्रत्यक्ष ब्राम्हण समाजाला लक्ष्य करण्यात येत असल्याचे दिसून आले होते. यापार्श्वभूमीवर ब्राम्हण समाजाच्या विविध संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागत त्याबाबत चर्चा करण्याची तयारी दर्शविली. यासंदर्भात ब्राम्हण समाजाच्या विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतर शरद पवार यांनीच सांगितले की, पहिल्यांदाच ब्राम्हण समाजाने माझ्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली.
.या बैठकीत ब्राम्हण समाजाने प्रामुख्याने तीन मागण्या करण्यात आल्या. यातील पहिली मागणी त्यांच्याकडून करण्यात आली की, ब्राम्हण समाजाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांबाबत समज देण्यात यावी अशी करण्यात आली. त्या वक्तव्याबाबत त्यांच्यात असलेली अस्वस्थताही त्यांनी यावेळी माझ्यासमोर व्यक्त केली. त्यावर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना भाषणात कोणत्याही जाती-धर्माविरोधात कोणीही वक्तव्य करायचे नाही अस सांगितल्याचे ब्राम्हण समाजाला सांगितल्याचे त्यांनी सांगितेल.
दवे नावाच्या व्यक्तीने माझ्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. इतरही संघटनांना मला भेटायचं होतं. त्यानुसार मी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना भेट निश्चित करण्यास सांगितलं. एकूण ४० लोक या बैठकीला होते. त्यांनी काही मुद्दे माझ्यासमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले.
ब्राह्मण संघटनांची दुसरी मागणी होती की ग्रामीण भागातील हा वर्ग शहरी भागात येत आहे. त्यामुळे त्यांना नोकरीत अधिक संधी मिळण्याची स्थिती हवी आहे. आम्ही केंद्र आणि राज्याची माहिती गोळा केली होती. त्यात नोकऱ्यांमध्ये त्यांची लोकसंख्येनुसार संख्या अधिकच दिसली. त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचं सूत्र बसणार नाही असं मी सांगितल्याचेही ते म्हणाले.
काहींनी कुणालाच आरक्षण नको असं म्हटले मात्र, मी मागास घटकांना आरक्षण द्यावंच लागेल असे सांगत आरक्षणाला विरोध करू नये, असंही मी सांगितलं. मागील हजारो वर्षे काही समाज हा मुख्य प्रवाहापासून मागे राहीला आहे. त्यामुळे तो समाज इतरांच्या बरोबरीने शिक्षणात, आर्थिकस्तरावर येत नाही. तोपर्यत त्यांना आरक्षण द्यावेच लागणार असल्याचे पवारांनी त्यांना सांगितले.
आपल्या राज्यात विविध समाजांना मदत करण्यासाठी महामंडळं आहेत. तसं ब्राह्मण समाजासाठी परशूराम महामंडळ काढावं अशी त्यांची मागणी होती. त्यावर मी त्यांना सांगितले की, तो प्रश्न राज्य सरकारचा आहे. त्यामुळे याप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन त्यांची आणि यांची भेट घडवून आणेल. त्यासाठी पुढील महिना-दिड महिन्यात यासंदर्भात त्यांच्या काही प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
ब्राह्मण समाजाबाबत वक्तव्य करणाऱ्या पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर बोलताना शरद पवार म्हणाले, मी पक्षातील नेत्यांना समज दिली आहे. त्यापेक्षा अधिक मी काही करू शकणार नाही. राज्यात वातावरण खराब झालं असं मला वाटत नाही. मात्र, जबाबदार पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी केलेल्या काही वक्तव्यांना काही वर्ग अस्वस्थ होऊ शकतो. अशावेळी जाणकारांनी चर्चा करून ती अस्वस्थता कमी केली पाहिजे. माझ्याकडे पहिल्यांदाच ब्राह्मण समाजाच्या संघटनांकडून भेटीची मागणी करण्यात आली. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेण्यासाठी मी ही बैठक घेतल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.