राज्यातील सत्ता संघर्ष नाट्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत विराजमान झाले. त्यानंतर जवळपास ४० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला यामध्येही मोठ्या प्रमाणावर नाराजीनाट्य पाहायली मिळाले. त्यामुळे आता दुसरा विस्तार कधी याची याकडे सामान्य जनतेपेक्षा फुटीर गटातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या आमदारांना आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी अनेक कलाकार, उद्योजक सुद्धा हजर होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री होण्यासाठी इच्छुक आमदारांची बैठक घेतली, भोजन सुरू होण्याआधी आणि नंतर अशा दोन टप्प्यांमध्ये बैठका घेण्यात आल्या होत्या. यावेळी पितृपक्ष संपल्यावर नवरात्र उत्सवामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती देण्यात आल्याचे समोर आले आहे. नवरात्रोत्सवाच्या मुहुर्तावर मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे कळते.
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारा बाबत चर्चा झाली असून आता लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच तयारीही पूर्ण झाली आहे. यामध्ये कोणतेही अडथळे राहिले नाहीत काही मुद्यांवर चर्चा सुरू आहे. त्यावरही तोडगा निघणार आह, असंही शिंदें यांनी स्पष्ट केलं असल्याचे समजते.
१० सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू होत आहे. त्यामुळे त्या पंधरावड्यात विस्तार करता येणार नाही. पितृपक्ष संपल्यावर पहिल्या दिवशी २६ किंवा २७ सप्टेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं. तसेच त्याचवेळी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादीही पूर्ण केली जाणार आहे. तसेच नावही जाहीर केली जातील अशी माहितीही शिंदें यांनी दिल्याचे कळते. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये १८ सदस्यांचा विस्तार पार पडला तर आता उर्वरीत सदस्य मिळून ४३ सदस्यांचे मंत्रीमंडळ होणार असल्याचे समजते.
या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील जास्तीत जास्त ९ इच्छुकांचा समावेश होणार आहे. तर उर्वरित खात्यांसाठी भाजपाच्या वाट्याला जाणार आहेत. तसेच राज्यमंत्री पदाचा शपथविधीही याच विस्तारा दरम्यान करण्यात येणार असल्याचे समजते. यापार्श्वभूमीवर आता कोणत्या इच्छुकाला कॅबिनेट तर कोणाला राज्यमंत्री पद मिळणार हे पाहणे औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.