पाच राज्यातील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर गांधी कुटुंबियांवकडून राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली. परंतु काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना पदावर कायम ठेवले. नेमके त्याच दिवशी जी-२३ च्या नेत्यांची गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा आज सोनिया गांधी यांची भेट घेत चर्चा केली.
गुरुवारी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत जी-२३ नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत पाच राज्यात काँग्रेसने केलेल्या निराशाजनक कामगिरीवर चर्चा झाली होती. आता गुलाम नबी आझाद सोनिया गांधींच्या भेटीला गेल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. १०, जनपथ या दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गुलाम नबी आझाद यांनी भेट घेतली.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतून काही सल्ले देण्यात आले होते. आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी काय करायला हवं, या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल गरजेचे असल्याचे मत गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले. सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांनी बोलत होते. एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज यावेळी आझाद यांनी व्यक्त केली.
जी-२३ नेत्यांनी बैठकीआधी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेस पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी काय करता येईल, या अनुशंगानने ही बैठक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाच्या चर्चांना उधाण आले होते. जी-२३ नेत्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल आणि सामूहिक नेतृत्व करण्याची मागणी केली होती.