महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची तिसरी लाट येवून गेल्यानंतर जवळपास सर्वच राज्यांनी कोरोनापासूनच्या बचावासाठीचे नियमावलीतून सूट दिली. तसेच अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवून टाकले. तर परदेशातील अनेक देशांमध्ये विशेषत: चीनसह इतर काही देशांमध्ये कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आढळून आल्याने काही देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही देशांनी निर्बंध जारी करण्याची तयारी केलेली असताना आज एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना अद्याप संपलेला नसून तो पुन्हा कधीही वाढू शकतो असा इशारा दिला.
पाटीदार समाजाचे दैवत मानल्या जाणाऱ्या माँ उमियाच्या मंदिराच्या १४ व्या स्थापना दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील वंथली येथे माँ उमिया धामच्या महोत्सव कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या एक हजारांच्या आसपास आढळत असून सर्वच राज्यांमधील कोरोना निर्बंध हटवले गेले आहेत. कोरोना हा संपलेला नाही, आणि तो पुन्हा कधीही वाढू शकतो, त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या, दुर्लक्ष करू नका असे आवाहनही त्यांनी केले.
बहुरूपिया कोरोना कधी कोणत्या रुपात परत येईल हे कोणालाच माहीत नाही. देशातील लोकांच्या पाठिंब्यामुळे या कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लसींचे जवळपास १८५ कोटी डोस देणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना हे एक मोठे संकट होते आणि ते संकट संपले आहे, असं आम्ही म्हणूच शकत नाही. आता जरी तो नसला तरी तो पुन्हा कधी येईल हे आम्हाला माहीत नाही. हा एक ‘बहुरूपिया’ आजार आहे. तो कधीही येऊ शकतो. लोकांचं या आजारापासून रक्षण करण्यासाठी जवळपास लसींचे १८५ कोटी डोस दिले गेले. आपण एवढा मोठा टप्पा गाठला याबद्दल जग आश्चर्य व्यक्त करतंय. परंतु तुमच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, नुकतीच कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी बुस्टर डोसच्या किंमतीत कपात केली आहे. तर केंद्र सरकारने या दोन्ही लस खासगी रूग्णालयातून नागरीकांना उपलब्ध करून देण्याबाबत धोरण तयार केले असून लसीशिवाय कमीत कमी १५० रूपये अतिरिक्त शुल्क आकारण्यास परवानगीही दिली आहे. तसेच आज रामनवमीपासून बुस्टर डोस सर्वांनाच घेता येणार आहे. ज्यांचे दोन्ही डोसला ९ महिने झाले आहेत अशांनाच हा डोस घेता येणार आहे.