देशातील सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीला अद्याप अवकाश असला तरी राज्यात निवडणूक आघाड्यांच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. एमआयएमने आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेनेने या युतीसंदर्भात झिडकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंत्यत सावध भूमिका मांडली असून याप्रश्नी बोलताना ते म्हणाले की, एमआयएमने आधी ते भाजपाची बी टीम नाहीत, हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान देत युतीबाबत अप्रत्यक्ष सकारात्मकता दाखविली आहे.
माझ्या आईचे निधन झाल्यानंतर राजेश टोपे आपल्या घरी आले असता त्यांना युती करण्याबाबत ऑफर दिल्याचे इम्तियाज जलील सांगितले. तसेच, आमच्यावर नेहमीच भाजपाची बी टीम म्हणून टीका केली जाते. पण आता आम्ही भाजपाला हरवण्यासाठी तुम्हाला युतीची ऑफर दिली आहे, तुम्ही तुमची भूमिका सिद्ध करा. भाजपाला हरवण्यासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो असे वक्तव्य करून जलिल यांनी एकच राजकिय धुराळा उडवून दिली.
त्यावर जयंत पाटील म्हणाले की, राजेश टोपे इम्तियाज जलील यांच्याकडे गेले होते. त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं म्हणून ते गेले होते. अशा वेळी राजकीय चर्चा करणं अभिप्रेत नाही. मला खात्री आहे की राजेश टोपेंनी तशी ती केलेली नसेल. त्यांच्याघरी कुणाचं निधन झालं असताना राष्ट्रवादीची अशी संस्कृती नाही की तिथे राजकीय चर्चा केली जाईल. त्यामुळे अशा चर्चेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नसल्याचेही स्पष्ट केले. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रात त्यांचा बी टीम होण्याचाच प्रयत्न होता हे सिद्ध झाले आहे. ते बी टीम नसतील, तर मग आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे, यावरून आपल्या लक्षात येईल की ते भाजपाच्या पराभवासाठी उत्सुक आहेत की भाजपाच्या विजयासाठी उत्सुक आहेत असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
तसेच एमआयएम पक्ष खरेच धर्मनिरपेक्ष आहे का ? याचाही अभ्यास करावा लागेल असेही ते म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आधी एमआयएमचा नेमका काय प्रस्ताव काय आहे? त्यांचे म्हणणे समजून घ्यावे लागले मग त्यावर निर्णय घेता येईल. परंतु भाजपाच्या पराभवासाठी जे कोणी समविचारी पक्ष एकत्र येवू इच्छितात त्यांना एकत्र केले पाहिजे अशी भूमिका स्पष्ट केली.