राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यानंतर भाजपाचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणाबाबत भलतेच वक्तव्य केले. त्यामुळे राजकिय वर्तुळात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. लाड यांनी केलेल्या विधानावर छत्रपती संभाजी राजे यांनी संताप व्यक्त करत थेट फडणवीस यांचे नाव घेत लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे आणि ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे अशी मागणी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी सूचनाही केली.
तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा धारण करत आता माफी मागून चालणार नाही तर भाजपाने आता रगडून प्रायश्चित केले पाहिजे अशी मागणी केली.
यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी लाड यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, लाड यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे असे म्हणाले.
एका खाजगी वृत्तवाहीनीशी बोलताना संभाजी राजे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
प्रसाद लाड यांचे विधान मी नुकतेच ऐकले. शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे ते म्हणत आहेत. हे दुर्दैव आहे. त्यांचा अभ्यास अपूर्ण आहे. प्रसाद लाड हे जबाबदार व्यक्तिमत्त्व आहेत. ते आमदार आहेत. मात्र शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचे ते म्हणत आहेत. ही शरमेची बाब आहे. मी त्यावर काय बोलणार. त्यांनीच याबाबत उत्तर द्यावे. लाड यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांना हे जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढून टाका, असेही ते म्हणाले.
प्रसाद लाड यांनी बेजबाबदार विधान केलेच कसे. लहान मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेतच शिकवणे गरजेचे आहे. प्रसाद लाड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. इकडे शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. ते आमची अस्मिता आहेत, असे लाड म्हणतात. तर दुसरीकडे शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असा दावा करतात. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. नुसती माफी मागी मागून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावे. देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
प्रसाद लाड यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, सकाळ झाली भाजपाचे लोक रोज एक बेताल व्यक्तव्य करत आहेत. अगोदर राज्यपाल यांनी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा यांनीदेखील वादग्रस्त विधान केले. त्यांनी शिवरायांवर वेगवेगळी वक्तव्यं करण्याची मालिकाच सुरू केली आहे. प्रसाद लाड यांनी नवाच जावई शोध लावला आहे. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांची राजधानी रायगड होती, असे आम्ही वाचत आलो आहोत. मात्र लाड म्हणत आहेत की शिवरायांचा जन्म कोकणात झाला. विशेष म्हणजे ते स्क्रीप्ट वाजून असे सांगत आहेत. म्हणजे उद्या गुजरात महोत्सव घ्यायचा असेल तर गुजरातच्या लोकांना खुश करण्यासाठी ते शिवरायांचा जन्म गुजरातच्या सुरतमध्ये झाला, असे म्हणतील. हे अत्यंत चुकीचे आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूक समर्थन कारणीभूत आहे, अशी खोचक टीकाही केली.