आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीला अद्याप अवकाश असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या कधीही होवू शकतात. यापार्श्वभूमीवर राज्यात नव्या राजकिय समीकरणांच्या अनुषंगाने एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली तरी भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर यापूर्वीच निशाणा साधत शिवसेना आता जनाब झाली असल्याची खोचक टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकेची झोड उठविली आहे.
मावळ मधील इंदूरी येथे बैलगाडा शर्यतीसाठी आल्यानंतर ते प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना रविवारी संबोधित केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या प्रस्तावाबाबतही भाष्य केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत नाहीत. अजान स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते आणि त्यांचे घटक पक्ष हे एमआयएमसोबत जाण्याचा विचार करत आहेत त्यावेळेस आरोपही करणार तेच. ही सगळी मिली जुली कुस्ती आहे. सगळे मिळून खेळत असल्याची उपरोधिक टीका केली.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे.