राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील डेंगळे पुलाजवळ अखिल ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ जाऊन अखिल ब्राह्मण महासंघाकडून मंत्रघोष करण्यात येत होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली असून या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर स्टेजवर उपस्थित असणारे धनंजय मुंडे यांनी यावर भाष्य केले. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मिटकरी यांनी केलेलं वक्तव्य हे एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. मिटकरी यांचं ते व्यक्तिगत भाष्य होतं. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितल्याचे स्पष्ट करत धनंजय मुंडे यांनी मिटकरी यांची पाठराखण केली. तसेच आपण अमोल मिटकरी यांच्याशी बोललो असून त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली असल्याचेही त्यांनी यावेळी दिली.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता. जात-पात, धर्म हे आमच्या अंगालादेखील शिवलेलं नाही. आमच्यासोबत सावलीप्रमाणे हे लोक उभे आहेत म्हणून इथपर्यंत पोहोचल्याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही मागे हसत असल्याचं दाखवले जात आहे. पण आम्ही त्याच कारणासाठी हसत होतो याच्यातला संदर्भ कुठेही नसल्याचे सांगत अमोल मिटकरी जे बोलले ते वैयक्तिक बोलले, मिटकरी याबाबत स्वतः स्पष्टीकरण देतील असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान पुण्यात ब्राम्हण महासंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर आल्याने पुण्यात तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली. मात्र मिटकरी यांनी त्यांच्या त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी ब्राम्हण महासंघांकडून करण्यात आली आहे. तसेच मिटकरींच्या त्या वक्तव्याने भावना दुखावल्याचेही त्यांनी सांगितले.