औरंगाबाद-मुंबई: प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात येत असलेल्या आरोपांवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मलिक एका चीडीतून या गोष्टी करत असल्याचे मत व्यक्त करत आता हे सगळं थाबायला हवं अशी भूमिका घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वगळता अद्याप तरी काँग्रेस आणि शिवसेनेने नवाब मलिक यांच्याकडून करण्यात येत असलेल्या आरोपांना पाठिंबा दिला नव्हता. परंतु संजय राऊत यांनी घेतलेल्या भूमिकेला ४८ तास उलटताच त्यांनी औरंगाबादमधील शिवसेनेच्या आक्रोश मोर्चात नवाब मलिक यांचे जाहिरपणे कौतुक करत मलिक यांनी नीट कार्यक्रम सुरु केल्याने ते मागे रेटल्याचे वक्तव्य करत नवाब मलिक यांची पाठीशी महाविकास आघाडी असल्याचे सांगत राऊत यांननी जाहिर केले.
औरंगाबादेत वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत होणारी वाढ यासह अनेक प्रश्नी केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाच्या समारोपासमयी झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते.
मागच्या सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात थोडी जरी वाढ झाली तरी त्या स्मृतीबाई लगेच गॅस नाचवत रस्त्यावर येत होत्या. मात्र आता पेट्रोल-डिझेल १०० री पार गेल्यानंतर आणि गॅसच्या दरात भरमसाठ वाढ झाल्यानंतरही त्या गॅस नाचवत रस्त्यावर आल्या नाहीत. कदाचीत त्यांना गॅस मिळत नसेल असा उपरोधिक टोला लगावत हवं तर इकडे या आम्ही तुम्हाला गॅसच्या १०-१५ टाक्या देवू अशी टीका त्यांनी केली.
भाजपाकडून सातत्याने मुख्य मुद्यावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी जाती-धर्माचे मुद्दे तर कधी पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करून नागरीकांना भटकाविण्याचा प्रयत्न सुरु आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावर तर जर वर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. लोकांनी एकदा नाही तर दोनदा तुम्हाला सत्ता दिली. कुठे गेल्या त्या नोकऱ्या असा सवाल करत कोरोना काळात उलट लोकांच्या नोकऱ्या गेल्या मात्र तुमच्या नोकऱ्यां काही दिसेना असेही ते म्हणाले.
देशात निवडणूका आल्या की त्या निवडणूका जिंकण्यासाठी देशात हिंदू-मुस्लिम असा नारा नेहमी भाजपाकडून दिला जातो. अमरावती, नांदेड, मालेगांव येथे झालेल्या दंगली या त्याचाच भाग असून हे भाजपानेच केलेल्या दंगली असून भाजपाकडून नेहमीच अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे. त्याशिवाय दंगलीच्या आडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपाचा जाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेनेच्या या आक्रोश मोर्चामुळे दिल्लीचे तक्त हलल्याशिवाय राहणार नसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काम न करू देण्यासाठीच भाजपाकडून सतत अस्थिर वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप भाजपावर करत शिवसेनेने आपले हिंदूत्व सोडले नसून देशप्रेम आणि देशातील नागरीकांना आपले मानणारे हिंदूत्व हे शिवसेनेचे आहे. त्यामुळे शिवसेनेने कधी हिंदूत्व सोडले ना कधी सोडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.