मुंबई: प्रतिनिधी
आज सकाळपासून ईडीने मुंबई आणि नागपूरातील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबधित व्यक्तींच्या घरावर छापे टाकले. या दरम्यानच्या काळात आपण ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य केले असून ईडी आणि सीबीआयला असेच सहकार्य करू अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे असल्याच्या भूमिकेचा पुर्नरूच्चार केला.
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना आयुक्त पदावरून हटविल्यानंतर त्यांनी आरोप केले. त्यामुळे त्या आरोपात तथ्य नसून ते खोटे आहेत. त्यांची भूमिका संशयास्पद राहील्यानेच परमबीर सिंग यांना पदावरून हटविण्यात आल्याचा पुर्नरूच्चार त्यांनी केला.
अँटालिया प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद राहीली आहे. सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे, प्रकाश धुमाळ आणि सुनिल माने हे पाचही जण सीआययुमध्ये कार्यरत असताना परमबीर सिंग यांना थेट रिपोर्टींग करत होते. हे सर्व जण त्या दोन्ही प्रकरणात सहभागी असल्याची माहिती राज्य सरकारला कळाली. तसेच याप्रकरणात पोलिस आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
अँटालिया प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्येचा तपास एनआयए करत आहे. तसेच हे सर्वजण तुरुंगात आहेत. सीबीआयकडून माझी चौकशी सुरु आहे. या चौकशीतून सत्य जनतेसमोर येईल असे सांगत सीबीआय आणि ईडीला माझे सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
अँटिलीया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी परमबीर सिंग यांची संशयास्पद भूमिका असल्याने त्यांना आयुक्तपदावरून हटविल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. केंद्रीय तपास यंत्रणांना मी पूर्णपणे सहकार्य करत असून सत्य लवकरच समोर येईल, असा मला विश्वास आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 25, 2021