राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दही हंडीसह सर्व सणांवरील निर्बंध पूर्णत: काढून टाकले. दही हंडीच्या दिवशी मुंबई ठाण्यातील भाजपा आणि शिंदे गटाच्या जवळपास सर्वच दही हंडी मंडळांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. त्या पाठोपाठ गणेशोस्तवाचा सण आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता इतर नेत्यांच्या घरी जावून गणरायाचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री शिंदेवर टीका करत टोला लगावला आहे.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जेव्हा जेव्हा टीव्ही बघते, तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाच्या तरी घरी दिसतात. विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसतात, सरकारी कामाच्या फारशा बातम्या दिसत नाहीत, अशी टीका केली.
सुप्रिया सुळे या पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
महाराष्ट्रात साम-दाम-दंड भेदचा वापर करून आणि ५० खोके सर्व काही ओके करून हे सरकार ओरबडून आणलं. पण मागील अडीच महिन्यात काहीही काम झालं नाही. मुख्यमंत्री केवळ घरगुती दौरे करत आहेत. ज्या उत्साहाने त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडलं, त्याच उत्साहाने ते कामं करताना दिसत नाहीत. एकनाथ शिंदे यांचे दौरे केवळ एक किलोमीटरच्या आतले असतात. जेव्हा जेव्हा टीव्ही सुरू करते, तेव्हा तेव्हा ते कुणाच्या तरी घरी भेटीगाठी घेण्यासाठी आलेले दिसतात, अशी टीका त्यांनी केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्याच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत आहे. पण त्यांच्याकडून वेळ दिला जात नाहीये. त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल. ते नेहमी कुणाच्या तरी घरी दिसतात. ते केवळ एक किलोमीटरच्या आतील दौरे करत आहेत. मागील अडीच महिन्यापासून राज्यात पालकमंत्री नाहीत. त्यामुळे लोकांनी तक्रार कुठे करायची? हेच कळत नाही, असा खोचक टीकाही त्यांनी केली.