राज्यातील सत्तांतरानंतर तब्बल ४० दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, भाजपात संधी न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे. त्यातच विधान परिषदेच्या निवडणूकीत, राज्यसभेच्या निवडणूकीत आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे यांनी कदाचित माझी पात्रता नसेल असे वक्तव्य करत आपली स्पष्ट नाराजी बोलून दाखविली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा कॅबिनेट मंत्री गिरीष महाजन यांनी मोठे वक्तव्य केले.
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, पंकजा मुंडे अजिबात नाराज नाही. पक्षश्रेष्ठी निश्चितपणे त्यांच्या कामाची दखल घेत आहेत. ते पंकजा मुंडेवर मोठी जबाबदारी देतील. एक तासापूर्वी पंकजा मुंडेंनी मला फोन केला आणि अभिनंदन केलं. त्या नाराज आहेत असं दिसलं नाही. माध्यमंच त्या नाराज असल्याचं बोलत आहेत.
पंकजा मुंडे नाराज नाहीत, माध्यमंच त्या नाराज असल्याचं वारंवार सांगत आहेत. त्या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि कोअर कमिटीच्या सदस्य आहेत. त्या मध्य प्रदेशसारख्या राज्याच्या प्रभारी आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामाची दखल घेऊन यापेक्षाही चांगली संधी देतील असं सूचक विधान त्यांनी केले.
राज्य मंत्रिमंडळात नाराज असलेल्या इतर भाजपा नेत्यांबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही दोन पक्ष आहोत आणि याबाबत पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील. अनेक जिल्ह्यांना न्याय मिळेल. उद्या पाच मंत्री झाले तरी काय वाईट आहे. अधिक वेगाने काम होईल असेही ते म्हणाले.