मुंबईः प्रतिनिधी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी वसूली करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगासमोर येवून कोणत्याही प्रकारची माहिती आणि पुरावे सादर करण्याची इच्छा नसल्याचे प्रतिज्ञा पत्र चांदिवाल आयोगाकडे सादर केल्याची माहिती पुढे आली आहे.
त्याचबरोबर याप्रकरणात आपल्याला कोणाचीही उलट तपासणी किंवा क्रॉस एक्झामिन करायचे नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या पुराव्याकडे आयोगाला घेवून जायचे नसल्याचेही परमबीर सिंग यांनी सांगितले.
याप्रकरणी चांदिवाल आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात परमबीर सिंग म्हणाले की, त्या प्रकरणासंबधी जी काही माहिती उघड करायची होती किंवा द्यायची होती. ती माहिती मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेली आहे. तसेच या दोघांनीही आपल्याला म्हणण्याची दखल घेतलेली आहे. त्याचबरोबर २०-३-२०२१ रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातही यासंदर्भात सविस्तर माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पाठविलेल्या पत्रांच्या आधारेच ११-१०-२०२१ रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसारच त्यावेळी आपले म्हणणे चांदिवाल आयोगासमोर मांडण्यात आले आहे. तसेच ते म्हणणे एक्सीबीट-ए म्हणून कागदपत्रांसोबत जोडण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
६-१०-२०२१ रोजी सादर केलेल्या म्हणण्यानुसारच आजही आपले तेच म्हणणे असल्याचे त्यांनी आपल्या म्हणणे स्पष्ट केले.
आता परमबीर सिंग यांनीच त्या पुराव्यांच्या अनुषंगाने कोणतीही माहिती किंवा पुरावे चांदिवाल समितीसमोर सादर करण्यात इच्छा नसल्याचे सांगितले. एकाबाजूला या आरोपप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केलेली असली तरी दुसऱ्याबाजूला मात्र चांदिवाल समितीसमोर कोणतेही म्हणणे मांडणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या आयोगासमोर अनिल देशमुख यांच्यावर ठपका ठेवला जाणार असल्याची शक्यता आता दुरापास्त आहे.
परमबीर सिंग यांनी दाखल केलेले हेच ते प्रतिज्ञा पत्रः-