साधारणतः १० दिवसांपूर्वी राज्यसभेच्या निवडणूकीच्या मतदानावेळी भाजपाकडून महाविकास आघाडीच्या मतदाना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपाने आक्षेप घेतला. त्यावेळी शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केले. त्याचे उट्टे काढत आज काँग्रेसने भाजपाचे आजारी आमदार असलेल्या पुण्याचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतला.
भाजपाचे आजारी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आज विधान भवनात येवून विधान परिषद निवडणूकीसाठी मतदान केले. मात्र या दोघांनी दुसऱ्यांच्या सहकार्याने मतपत्रिका पेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसच्या सदस्यांनी घेत या दोघांची मते रद्द करण्याची मागणी केली.
भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी पुण्याहून खास आले होते. मात्र हे दोन्ही आमदार स्वस्त उठून चालू शकत नसल्याने या दोघांनाही व्हिल चेअरवरून मतदानाच्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे त्यांनी मतपत्रिकेवर शिक्का मारला. त्यानंतर त्या मतपत्रिका दुसऱ्या व्यक्तीच्या सहकार्याने मतपेटीत टाकल्या.
त्यावर काँग्रेसचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेत तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविला. काँग्रेस सदस्यांनी सदरची बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आक्षेपाची पडताळणी करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना निर्णय राखून ठेवला.
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपाबाबत बोलताना म्हणाले की, विधान परिषदेत मतदान करताना सहकार्याची मदत लागणार असल्याची शक्यता गृहीत धरत भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आधीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आक्षेपाला काहीही अर्थ नाही.