भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केल्याने त्यांना धडा घडविण्यासाठी पहाटेचा शपथविधी गरजेचा होता, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी एका वर्तमान पत्राच्या कार्यक्रमात बोलताना केलं होतं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले.
मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांना नागपुरात विचारण्यात आलं. त्यावर, मुनगंटीवार यांनी धडा शिकवण्याचा भाषा केली. पण, एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन त्यांनी चांगलाच धडा शिकला आहे. म्हणून त्यांना आपण आगीतून उठून फुफूट्यात पडलो, असं वाटत असेल. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर अजून धास्ती घेतली आहे, असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला.
एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याने त्यांची नकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे ‘बुंदसे गयी वो हौदसे नही आती है’… हे सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात येत नाही. म्हणून ते वक्तव्य करत आहेत, असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.