मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावरून भाजपा नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्याला आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले.
राज्यात याकूब मेमनच्या सुशोभीकरणावरून भाजपाने हैदोस मांडला आहे. काट्याचा नायटा करायचा प्रयत्न सुरु आहे. गणपतीसारख्या उत्सवामध्ये विघ्न निर्माण करण्यासारखे खोटे आरोप भाजपाचे नेते करत आहेत. तुम्हीच याकूब मेमनची बॉडी त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिली. त्याचं थडगं तुम्ही उभ केलं. त्याबद्दल माफी मागा, अशी मागणी करत भास्कर जाधव यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला.
अमरावतीच्या लव्ह जिहाद प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जोरदार राडा केला. त्यावरूनही भास्कर जाधव यांनी नवनीत राणा यांचा समाचार घेतला आहे. भाजपच्या सहयोगी खासदारांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. मुलगी पलवून नेली म्हणून पोलीस स्टेशनमध्ये हैदोस घातला. तो उभ्या देशाने बघितला. ती मुलगी साताऱ्याला सापडली आहे, असेही ते म्हणाले.