काही दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नुपूऱ शर्मा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले. मात्र, अद्याप नुपूर शर्मा मुंबई पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्या कुठे गेल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई पोलिस नुपूर शर्मा हिचा दिल्लीत शोध घेत असल्याची माहिती इंडिया टुडेच्या संकेतस्थळाने दिली आहे.
रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना समन्स बजावले आहे.
महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत. मात्र, त्या सध्या नॉट ट्रेसेबल असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर ठाण्याबरोबरच पायधूनी पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समन्स बजावल्यानंतर कारवाईसाठी दिल्ली पोलीस योग्य सहकार्य करत नसल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे.
एका टिव्ही कार्यक्रमात चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित महोम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. देशात ठिकठिकाणी नुपूर शर्मा यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. तसेच मुस्लिम बांधवानी शर्मा यांच्या अटकेची मागणी केली.
नुपूर शर्मा हिच्या वक्तव्याचे पडसाद भारताबरोबरच आखाती देशातही उमटल्याने आखाती देशातील सरकारांनी भारतीय राजदूतांना कार्यालयात बोलावून याप्रकरणी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भारत सरकारकडून नुपूर शर्मा यांच्या व्यक्तव्याशी केंद्र सरकारचा संबध नसल्याचे खुलासा करत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र आखाती देशातील नागरीकांकडून नुपूर शर्मा हिच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कचऱ्याच्या डब्यावर लावत त्यावर बुटाचे ठसे उमटविले. त्याचबरोबर अनेक भारतीय उत्पादनावर बहिष्काराचे हत्यार उपसले. त्यामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताची मोठी नाचक्की झाली. अखेर भाजपाने नुपूर शर्मा हिच्यावर कारवाई करत प्रवक्ता पदावरुन काढून टाकत पक्षातून निलंबित केले.