राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-भाजपा सरकार स्थापन केले. या घटनेला आता जवळपास ९ महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही शिंदे गटाचे मंत्र्यांकडून आपले बंड कसे योग्य होते याचेच दाखले देत असून यापार्श्वभूमीवर जळगांवातील भोरखेडा येथील एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी म्हणाले, मंत्री पदाचा सट्टा लावत एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. एकूण ४० आमदार फुटले त्यात ३३ नंबरला मी गेलो असे सांगितले.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथे विविध योजनांच्या उद्घाटनानंतर गुलाबराव पाटील बोलत होते.
पुढे गुलाबराव पाटील म्हणाले, नागपूरपासून दादरपर्यंत सर्व आमदार गेले. मी एकटाच राहिलो असतो. मग, विकास करू शकलो असतो का? पण, उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात होते. त्यांना विनंती केली, हात जोडले, पाया पडलो, असा दावाही केला.
यावेळी उध्दव ठाकरे यांच्या भेटीचा संदर्भ देत गुलाबराव पाटील म्हणाले, आपल्यातील एक मराठा चेहरा लांब जात आहे. तो जाता कामा नये. त्यांना समजवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावर संजय राऊतांनी जायचं तर जाऊ दे. मग मी पण गेलो. सरपंच पदाचा राजीनामा देताना लोकं विचार करतात. आम्ही तर आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. बहुमताचा आकडा जमला नसता तर? मात्र, आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावूनचा शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत उध्दव ठाकरेंची साथ सोडण्याचे एकप्रकारे योग्य असल्याचे अप्रत्यक्ष सांगितले.
मागील सात महिन्यांत एकनाथ शिंदे पाचवेळा जळगाव जिल्ह्यात आले. असा मुख्यमंत्री कोठेही सापडणार नाही. परंतु, आतापर्यंत त्यांच्याबरोबर होतो, तर चांगला होतो. आता एकदम बिघडून गेलो. पश्चिम बंगालमध्ये सापडलेले २७ कोटी सापडले होते. ते आणण्याासठी एक ट्रक लागला. मग, ५० कोटी आणायला दोन ट्रक लागले असते ना, असा उपरोधिक सवाल खोक्यांच्या आरोपांवरून त्यांनी उपस्थित केला.