शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जणांनी बंडखोरी करत शिवसेनेवर दावा केला. तसेच उध्दव ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसह त्यांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर पुन्हा उध्दव ठाकरे गटाकडूनही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. मात्र कायदेशीर बाबी सुरु असतानाही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग सुरु झाली असून सकाळी ११ ते १ वाजण्याच्या कालावधीत राजभवनात हा शपथविधी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबतचा सवाल सातत्याने विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यातच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १० दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आल्याने राज्यपाल भवन आणि राज शिष्टाचार विभाग रेडी पोझिशनमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही विभागाकडून फक्त मुख्यमंत्री कार्यालयाकडून कधी संदेश येतो यासाठी तत्पर राहिल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान राज्यपाल भवनात यासंदर्भात चौकशी करण्यात आली असता तेथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यपाल भवनात उद्या सकाळी शपथविधि होणार आहे. त्यादृष्टीने तयारी सध्या येथे सुरु आहे. तसेच सकाळी ११ ते १ या कालावधीत हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या मान्सूनचा पाऊस राज्यात मुसळधार स्वरूपात पडत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अनेकांचे प्राणही जात आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींवर तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे. यापार्श्वभूमीवर किमान राज्यातील पावसामुळे बाधित जिल्ह्यांना पालकमंत्री मिळावे या उद्देशाने उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात २० ते २५ मंत्र्यांना शपथ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामध्ये भाजपाचे किमान १० मंत्री शिंदे गटातून तर १५ मंत्री भाजपामधील असतील असे सांगण्यात येत आहे.